आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ; अचानक बदलली प्रश्नपत्रिका, काय कारण?

Khozmaster
2 Min Read

 नाशिक : दररोज दहा वाजता सुरू होणारा पेपर तब्बल एक ते दीड तास उशिरा सुरू झाल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेत बुधवारी गोंधळ उडाला.बुधवारी असलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा बॉक्स आधीच्या पेपरला म्हणजेच सोमवारी उघडला गेल्याने विद्यापीठामार्फत अचानक बुधवारची प्रश्नपत्रिका बदलण्यात आली. ही प्रश्नपत्रिका हातात मिळेपर्यंत एक ते दीड तास हे विद्यार्थी बसून होते. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान एका विषयासाठी दुसऱ्याच विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा बॉक्स उघडल्याची घटना नागपूरच्या व्हीएसपीएम डेंटल कॉलेज या केंद्रावर ६ नोव्हेंबरला घडली. त्यामुळे ज्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा बॉक्स उघडला गेला ती प्रश्नपत्रिका तातडीने बदलण्याचा निर्णय झाला. बुधवारी सकाळी दहा वाजता या प्रश्नपत्रिका प्रत्येक परीक्षा केंद्राकडे ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या खऱ्या, परंतु या प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढून त्या विद्यार्थ्यांच्या हातात मिळेपर्यंत तब्बल एक ते दीड तास परीक्षा केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. दररोज सकाळी दहाला पेपर सुरू होत असल्यामुळे साडेनऊला विद्यार्थ्यांना परीक्षा वर्गात प्रवेश देण्यात आला होता. परंतु, त्याच्या हातात पेपर मिळायला मात्र एक ते दीड तास लागला. बहुतांश परीक्षा केंद्रांवर १५०, तर काही केंद्रांवर २५० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी पेपरची प्रिंट काढेपर्यंत परीक्षा केंद्रावरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. एमबीबीएस २०१९ च्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला राज्यभरातून ८ हजार ३९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

म्हणून बदलला पेपर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी २०२३ सत्राच्या लेखी परीक्षा २८ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात येत आहेत. राज्यभरातील ५० परीक्षा केंद्रांवर या परीक्षा सुरू आहेत. ६ नोव्हेंबरला नागपूरच्या व्हीएसपीएम डेंटल कॉलेज या केंद्रावर अनवधानाने एमबीबीएस-२०१९ पॅटर्न अभ्यासक्रमाच्या बायोकेमिस्ट्री भाग एक विषयाऐवजी बायोकेमिस्ट्री भाग दोनची विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा बॉक्स उघडण्यात आला. बायोकेमिस्ट्री भाग दोन विषयाची परीक्षा ८ नोव्हेंबरला असताना आधीच या प्रश्नपत्रिकेचा बॉक्स उघडण्यात आला. ही बाब लक्षात येताच कुलगुरूंच्या आदेशानुसार राज्यातील सर्व ५० परीक्षा केंद्रांवर ८ नोव्हेंबरला बायोकेमिस्ट्री भाग दोन विषयाची दुसरी प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत पुरविण्यात आली.

तातडीच्या प्रश्नपत्रिका बदलण्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रसंग टाळण्यात आला. परीक्षा प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून तत्परतेने कार्यवाही करण्यात आली. या घटनेबाबत विद्यापीठामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.-डॉ. संदीप कडू, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

0 9 4 8 6 4
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *