जालना: हक्काच्या आरक्षणासाठी मराठा समाज शांततेत आंदोलन करीत आहे. पण, काही लोक त्यांच्या विरोधात विद्वेष पसरविण्याचे काम करीत आहे. मुंबईत गाड्या फोडल्याची घटना मला ठावूक नाही. अशी घटना घडली असल्यास मी त्याचे समर्थन करीत नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांवरील तोडफोडीच्या घटनेवर दिली. पंतप्रधानांना गोरगरिबांच्या प्रश्नाची जाण आहे असे वाटत होते. पण, त्यांनी राज्यात येऊन निराशा केली असून त्यांना गोरगरीबांची गरज उरलेली नाही, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठवाड्यातील शेकडो गावांनी नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. शिवाय, जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्कलनिहाय गावांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. दावरवाडी (ता. पैठण) सर्कलमधील १९ गावांनी उपोषणात सहभाग घेतला आहे. औराळा (ता. कन्नड) सर्कलमध्येही १२ नोव्हेंबरपर्यंत साखळी उपोषण सुरू आहे. तालुक्यातील ३३ गावांनी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे.
‘आम्ही लढायला सज्ज’
पंतप्रधानांना गोरगरिबांची गरज राहिलेली नाही. त्यांनी मराठा आरक्षणाचा राज्य सरकारला निरोप देणे अपेक्षित होते. पण, देशाचा सर्वोच्च माणूस महाराष्ट्रात येऊनही निराशा झाली. आता मराठा स्वत:च्या बळावर लढायला सज्ज झाला आहे. आता धनगर आणि मुस्लिम बांधवही सावध होतील. आम्ही राज्य सरकारला विनंती केली होती. पण, इथे येऊनही पंतप्रधानांनी मदत केली नाही, असे जरांगे म्हणाले. स्वत:चा न्याय स्वत: मिळविण्यास सज्ज आहोत. आम्ही कुणावर अवलंबून राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासाठी दोन आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी आपतगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील गणेश काकासाहेब कुबेर (वय २८) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, असे त्याने पाटीवर लिहिले आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरातील नियोजित ‘कँडल मार्च’ स्थगित करण्यात आला. आंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी) येथील शिवाजी माने (वय ४२) या व्यक्तीने आत्महत्या केली. दोन एकर शेती असलेल्या माने यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला, असे ग्रामस्थांनी सांगितले.
Users Today : 36