धाराशिव: तेरखेडा येथील सुतळी बाँम्बमुळे ध्वनी प्रदूषण वाढत असून लहान मुलांना या आवाजामुळे कमी ऐकायला येत आहे. तसेच हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनाही याचा नाहक त्रास होत असल्यामुळे फटाका बनवणाऱ्या कारखानदारांवर कारवाईची मागणी होत आहे.
धाराशिव जिल्हयातील तेरखेडा या गावाची फटाक्याची उत्तर काशी म्हणून ओळख आहे. येथील फटाके मोठा आवाज देतात म्हणुन राज्यातील ग्राहक, दुकानदार मोठया प्रमाणात तेरखेडा येथे फटाका खरेदीसाठी येतात. दिवाळी उत्सवात ५० कोटींची उलाढाल या गावात होते तर वर्षभरात १०० कोटींची उलाढाल या व्यवसायातून होत असते. फटाका उत्पादनासाठी महसुल प्रशासनाने ४२ कारखानदारांना परवाना दिलाय. प्रत्यक्षात मात्र १०० पेक्षा अधिक कारखानदार फटाका उत्पादन घेतात.
येथे बनतात फटाक्यांसह सुतळी बाँम्ब
धाराशिव जिल्हयातील तेरखेडा,गोजवडा,चोराखळी,इंदापुर,पिंपळगाव,गोपाळवाडी,कसबे-तडवळे,माणकेश्वर,बावी या गावांमध्ये फटाका बनवण्याचे कारखाने आहेत.येथील फटाका विशेषतः सुतळी बाँम्ब राज्यात तसेच परराज्यात विक्री होते.
यंत्रणेकडे आवाज मोजणीचे यंत्रच नाही
सुतळी बाँम्बचा आवाज इतका मोठा असतो की कान सुन्न होतात, काही क्षणांसाठी माणूस बधीर होतो. सुतळी बॉम्बचा आवाज मोजण्याचे यंत्र महसुल प्रशासन,प्रदूषन महामंडळ,औद्योगिक महामंडळ(सुरक्षा) यांच्याकडे सुध्दा नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. शासनाने ७५ डेसीबल आवाजाची मर्यादा ठेवली आहे. तेरखेडा येथील फटाका मात्र १५० डेसीबलपेक्षा जास्त आवाज देतात. आवाजाची मोजणी करण्याचे काम महसूल प्रशासनाचे नाही. यासाठी वेगळी यंत्रणा आहे असे महसूल खाते सांगतय.
आवाज मोजणीचे यंत्र आमच्याकडे नाही आम्ही फक्त हवेचे प्रदूषन पाहतो असे प्रदूषन विभाग सांगतय.जर हवेचे प्रदूषन पाहत असतील तर आवाजामुळे होणारे प्रदुषन कोण पाहणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिसांची फक्त N-O-C
फटाका उत्पादन करणाऱ्या कारखानदारांना महसूल विभाग परवाना देतो. आमच्याकडे अर्ज आला तर आम्ही फक्त नाहरकत देतो. बाकीचे आम्ही पाहत नाही अस येरमाळा पोलीस सांगतात. तेरखेडा परिसरात यापुर्वी अनेकदा दुर्घटना झालेल्या आहेत. संबधित कारखानदारांकडे आगीवर नियंत्रित करण्याची यंत्रणा नसल्यामुळे इतर ठिकाणचे फायर ब्रिगेडची वाहने बोलावून आग विझवावी लागते.
तेरखेडा येथील सुतळी बाँम्बचा आवाज हा शासनाने निर्धारित केलेल्या आवाजापेक्षा जास्त असल्यामुळे लहान मुले तसेच वयोवृध्द, हृदय रोगी यांना जास्त त्रास होत असल्यामुळे या सुतळी बाँम्ब बनवणाऱ्या कारखाण्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
Users Today : 66