नांदेड: पती, दोन मुलं, असं आमचं छोटसं कुटुंब होतं. गरिबीचा संसार. आम्ही आमच्या पद्धतीने चांगलंच रहात होतो. दिवाळी आली की, कपडेलत्ते, फराळ, येणार जाणारे असं सारं काही होतं. आता पोरं मोठी झाली, त्यांची लग्न झाली. पती गेले, आपलीच अडचण व्हायला लागली. मुलांच्या सुखासाठी राहते घर सोडले. अन् वृद्धाश्रम गाठले. भरल्या घरातील दिवाळी आठवून परभणी जिल्ह्यातील महातपूरी येथील राधाबाई बाबुराव देशपांडे यांचे डोळे पाणवले होते.
मुलांना पदरमोड करून शिकवले. आज एक मुलगा चंद्रपूर आणि दुसरा गुजरातमध्ये नामांकित कंपनीत मोठ्या पदावर आहे. मुले मोठी झाली. त्यांची लग्न झाली. कष्टाचे चिज झाले. पुढे २००९ मध्ये पती बाबुराव यांचे निधन झाले. मी ही एकाकी पडले. सुनांना माझी अडचण व्हायला लागली. घरात भांडण होतं होती. कोणी ही विचारत नव्हते. तुम्ही राहत असाल तर आम्ही राहणार नाहीत, असं म्हणत होत्या. आपल्यामुळे मुलाचा संसार मोडला नाही पाहिजे. म्हणून मीच माझं राहतं घर सोडून संध्या छाया आश्रमात आले. या ठिकाणी मला दोन वर्षे होत आहेत. येथे कशाचीच कमी नाही. हे ही एक कुटुंबच आहे.एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही सोबत असतो. एकमेकांसोबत गप्पागोष्टी करत असून खेळून राहतो. या वयात आणखी काय पाहिजे? नातू अधूनमधून भेटायला येतात. जुन्या आठवणीत रमले की दाटून येते, असे सांगून राधाबाईंनी अश्रुंना वाट मोकळी केली. दरम्यान मागील दीड वर्षांपासून त्या संध्या छाया वृद्धाश्रमात राहत आहेत. त्यांच्यासोबत अनेक महिला राहतात. वृद्धाश्रमात दिवाळी साजरी होते. फराळ, साडी चोळी भेट म्हणून दिलं जातं. मात्र त्यांना आज ही त्यांना मुलासोबत दिवाळी साजरी केलेल्या क्षणाची आठवण येत असते.
Users Today : 64