एकनाथ शिंदे-अजितदादा खंदे बॅट्समन, भक्कम विकेटकिपिंग करायला मी आहेच: देवेंद्र फडणवीस

Khozmaster
2 Min Read

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या चर्चेला फडणवीस यांनीच अखेर पूर्णविराम दिला. आपण नागपुरातूनच विधानसभा लढणार असल्याचे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तर त्याचवेळी पालिका निवडणुकांसाठीही आम्ही सज्ज असून, ग्रामपंचायत निवडणुकांमधील आमच्या यशाचे प्रतिबिंब निश्चितच या निवडणुकांमध्ये दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दीपावलीनिमित्त आयोजित स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी वरील स्पष्टीकरण देत लोकसभा निवडणुकांबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लावला. फडणवीस म्हणाले की, देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्याचा निश्चय केला आहे. त्यात आता कोणताही बदल होणार नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखविला. तर राजकारणात पुढे काय होते, हे भाकित करता येत नाही. मात्र, दहा वर्षांनी देखील मी भाजपसाठीच काम करत असेन आणि पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी निश्चितच पार पाडेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर महापालिका निवडणुकांसाठी तयार असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आम्हालाही निवडणुका हव्याच आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमधील आमच्या यशाचे प्रतिबिंब निश्चितच या निवडणुकांत पडेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले

भक्कम विकेटकिपिंग करायला मी आहेच

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे खंदे बॅट्समन आहेत. भक्कम विकेटकिपिंग करायला मी आहेच. त्यामुळे सरकारमध्ये कोणतेही टेंशन नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दिवाळसणानिमित्त शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल फडणवीस म्हणाले की, राजकारण आणि कौटुंबिक नाती ही वेगवेगळी असतात. या भेटीमुळे हेच स्पष्ट झाले. अशी कौटुंबिक भेट झाल्याचा आपल्याला आनंदच झाला, असेही ते म्हणाले.

राजकारणात कटुता नकोच

राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात कटुता नकोच. महाराष्ट्रातही ती नाही. फक्त चार पाच व्यक्ती सोडल्या, त्यांची वक्तव्ये सोडली तर महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही कटुता उरेल असे वाटत नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *