मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या चर्चेला फडणवीस यांनीच अखेर पूर्णविराम दिला. आपण नागपुरातूनच विधानसभा लढणार असल्याचे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तर त्याचवेळी पालिका निवडणुकांसाठीही आम्ही सज्ज असून, ग्रामपंचायत निवडणुकांमधील आमच्या यशाचे प्रतिबिंब निश्चितच या निवडणुकांमध्ये दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भक्कम विकेटकिपिंग करायला मी आहेच
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे खंदे बॅट्समन आहेत. भक्कम विकेटकिपिंग करायला मी आहेच. त्यामुळे सरकारमध्ये कोणतेही टेंशन नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दिवाळसणानिमित्त शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल फडणवीस म्हणाले की, राजकारण आणि कौटुंबिक नाती ही वेगवेगळी असतात. या भेटीमुळे हेच स्पष्ट झाले. अशी कौटुंबिक भेट झाल्याचा आपल्याला आनंदच झाला, असेही ते म्हणाले.
राजकारणात कटुता नकोच
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात कटुता नकोच. महाराष्ट्रातही ती नाही. फक्त चार पाच व्यक्ती सोडल्या, त्यांची वक्तव्ये सोडली तर महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही कटुता उरेल असे वाटत नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Users Today : 47