राज्यात रविवारपासून थंडी? मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये हुडहुडी भरणार; वाचा हवामान अंदाज

Khozmaster
2 Min Read

मुंबई : राज्यात किमान तापमानाचा पारा १४ ते १५ अंशांपर्यंत खाली उतरला आहे. त्यामुळे गारठा जाणवत आहे. मात्र हा पारा अजूनही आत्ताच्या सरासरी किमान तापमानापेक्षा अधिक आहे. उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन क्षेत्रामध्ये पश्चिमी प्रकोपामुळे रविवारपासून राज्यात थंडी जाणवायला लागेल अशी शक्यता आहे.आज, शुक्रवारपासून महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत किमान तापमानात काहीशा घसरणीची व हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता असल्याची माहिती माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. रविवार, १९ नोव्हेंबरपासून उत्तर भारतात पश्चिमी प्रकोपाची आणि त्यामुळे पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता आहे. या प्रभावाखाली महाराष्ट्रामध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे.

सध्याच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये २२ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानाचा पारा फार खाली उतरण्याची शक्यता नाही. मुंबई आणि महामुंबई परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वनक्षेत्राच्या परिसरामध्ये पहाटेच्या तापमानात काहीशी घट जाणवत आहे. मात्र त्या पलीकडे मुंबईला फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. २० नोव्हेंबरपर्यंत मुंबईचे किमान तापमान २४ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी किमान तापमान २२ अंशांपर्यंत खाली उतरू शकते. मात्र या कालावधीत कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांदरम्यान असेल.

कमाल तापमानात सध्या तरी मुंबईला दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मात्र, बंगालच्या उपसागरात असलेल्या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत वातावरण काहीसे ढगाळलेले असेल. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान कमी होऊ शकते. मात्र यामुळे पावसाची शक्यता नाही, असे खुळे यांनी सांगितले.कोकण विभागात ३३ ते ३५ अंशांदरम्यान पारा

सांताक्रूझ येथे गुरुवारी ३५.२, तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे ३५.१, डहाणू येथेही ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. राज्यात गुरुवारी सर्वाधिक कमाल तापमान डहाणू येथे नोंदले गेले. डहाणूचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.१ अंशांनी अधिक होते. राज्यात केवळ कोकण विभागात सध्या किमान तापमानाचा पारा २० अंशांपलीकडे नोंदला जात आहे. उर्वरित राज्यात पहाटेचे वातावरण सुखद आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे १३.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुणे, नगर, जळगाव, नाशिक येथे किमान तापमान १५ अंशांच्या खाली उतरले होते.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *