रात्री कंपनीत वावर; सकाळी परिसर पिंजून काढला, तरीही ठावठिकाणा नाही, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?

Khozmaster
2 Min Read

कल्याण: कल्याणजवळील वरप गावांमधील टाटा कंपनीमध्ये काल रात्री एक ते दीडच्या सुमारास बिबट्या वावर असल्याचे कंपनीच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून याबाबत कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून वन विभाग अधिकाऱ्याला माहिती देण्यात आली आहे. सध्या वन विभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा शोध सुरू केला आहे. मात्र रात्रीच्या वेळेला बंद असलेल्या कंपनीत बिबट्या आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याण मुरबाड रोडवरील वरप गावाच्या मागील बाजूस असलेल्या टाटा पावर हाऊसमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. टाटा पावर हाऊस परिसरात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कैद झाला असून या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान या घटनेनंतर वन विभागाने हा संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र बिबट्याचा शोध लागला नाही. जांभूळ जंगलाचा हा परिसर असून बिबट्या वाट चुकल्याने या भागात आला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

मुरबाड, माळशेज घाट ते बारवी घाटापर्यंत विस्तीर्ण जंगल पट्टा आहे. मुबलक पाणी आणि सुरक्षित अधिवास असल्यामुळे मोठी वन्यजीव साखळी या भागात आढळते. वाघ, बिबट्यासारखे हिंस्र प्राण्यांचा वावर देखील आहे. अलिकडे या वन्य प्राण्यांचा वावर मानवी वसतीत वाढला आहे. त्यात बिबट्यांची संख्या मोठी आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. तर मानव आणि वन्य प्राण्यांच्या या संघर्षात अनेक बिबट्यांनी जीव गमवावा लागला आहे.सध्या बिबट्या तेथून निघून गेला असून नागरिकांनी देखील सतर्क रहावे, रात्री अपरात्री एकट्याने फिरू नये. याचबरोबर वनविभागातर्फे वरब गावासह आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या जागृतीसाठी बॅनर लावण्यात आले आहेत. वनविभागाचे पथक देखील या परिसरात तैनात करण्यात आले आहे. सध्या या बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *