फटाके उडवताना हलगर्जी महागात, ठाण्यात गृहसंकुलाच्या पार्किंगला आग, १६ वाहनं जळून खाक

Khozmaster
2 Min Read

ठाणे : दिवाळीच्या निमित्ताने फटाके उडवताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने ठाण्यातील एका गृहसंकुलाच्या पार्किंग परिसरात लागलेल्या आगीत तब्बल १३ दुचाकी व तीन चारचाकी वाहने जळून खाक झाल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री समोर आला आहे.पाचपाखाडी येथील कचराळी तलावाजवळ सरोवर दर्शन टॉवरमध्ये ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे, ठाणे पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या इमारतीत रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवले जात असल्याने ही दुर्घटना नेमकी कशी घडली, पार्किंग सारख्या दाटीवाटीच्या भागात फटाके फोडण्यास परवानगी कोणी दिली, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात असून पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पहावे लागणार आहे.

ठाण्यात अल्मेडा रोडवर सरोवर दर्शन टॉवरच्या तळ अधिक एक मजली पार्किंगमध्ये पहिल्या मजल्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लागल्याची माहिती पाचपाखाडी अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी नौपाडा पोलीस कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान पोहचले. त्यांनी तब्बल ४५ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत १३ दुचाकी व तीन चारचाकी वाहनांना आग लागली होती. आग लागलेल्या १३ दुचाकीपैकी ११ दुचाकी पूर्णतः जळाल्या असून इतर चारचाकी वाहनेही जळाल्याने त्यांचे नुकसान झाले. पार्किंग परिसरात फटाके पेटवल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आगीची चौकशी करण्यासाठी बुधवारी सकाळी अग्निशमन दल व पोलीस सरोवर दर्शन इमारतीत दाखल झाले आहेत.

भिवंडीतील गोदामाची आग सात तासाने आटोक्यात

भिवंडीच्या काल्हेर येथील ओसिया माता कंपाऊंडमध्ये मे. शाम फायबर प्रा. ली. या कापसापासून धागा बनविण्याच्या गोदामाला मंगळवारी राञी आग लागली होती. ही आग सात तासांच्या अथक प्रयत्नांनतर पुर्णपणे विझविण्यात आली.

0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *