नाशिक : इजिप्तने कांद्यास पुढील तीन महिन्यांसाठी निर्यातबंदी केल्याने अप्रत्यक्षरीत्या केंद्र सरकारचा कांदा आयात करण्याचा एक दरवाजा बंद झाला आहे. स्थानिक बाजारपेठेत उन्हाळ कांदा संपुष्टात आल्याने अन् यंदा कांद्याचे उत्पादन घटल्याने कांदादराने उसळी घेतली आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे ग्राहककेंद्री राजकारण करण्यासाठी सरकारच्या हाती जास्तीच्या कांद्याची आवश्यकता आहे. मात्र, बाजारातील कांद्याची तूट ही मागणी व पुरवठ्यातील अंतर वाढवीत असल्याने दिवाळीनंतरही कांद्याचे दर टिकून आहेत. दुसरीकडे स्थानिक बाजारातील कांद्याचे दर आवाक्यात राहण्यासाठी केंद्राने लागू केलेले निर्यातमूल्य डिसेंबरअखेरपर्यंत राहील. दरम्यान, इजिप्तच्या कांद्याबाबत संभ्रमित करणारी माहिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केली जात आहे. त्यामुळे याबाबतच्या वृत्ताची खातरजमा करून घेण्याचे आवाहन राज्य कांदा उत्पादक संघटनेने केले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत संपुष्टात आलेल्या उन्हाळ कांद्यासह नव्याने येणाऱ्या लाल कांद्याला मिळणारा दर स्थिर राहील, असे व्यापारीवर्गाचे मत आहे.
यापूर्वी केले होते दरनियंत्रण
भारताने या अगोदर सन २०१९-२० सालात इजिप्तकडून कांद्याची आयात केली होती. सद्यस्थितीत आता तीन महिन्यांसाठी इजिप्तकडून कांदा निर्यात होणार नसल्याने केंद्राचा एक पर्याय बंद होणार आहे. दुसरीकडे भारत-पाकिस्तानच्या पारंपरिक तणावपूर्ण संबंधांमुळे तेथूनही कांदा आयात होण्याची शक्यता नाही. या अगोदरही काही वर्षांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने वेळोवेळी इजिप्तसह आखाती देशांमधून कांद्याची आयात करून स्थानिक बाजारपेठेत दर नियंत्रित केले होते.
तेजी टिकण्याची चिन्हे
दरनियंत्रणाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या रोषालाही सरकारला सामोरे जावे लागले होते. मुंबईसह ठाणे, कल्याण आदी भागात ‘नाफेड’च्या माध्यमातून कांदा बाजाराच्या तुलनेने कमी दरात देण्यास सरकारने सुरुवात केली असली, तरी साठा संपेपर्यंतच हे सरकारला शक्य होणार आहे. यंदा कांद्याचे सर्वत्र घटलेले उत्पादन, साठवणूक केलेला कांदा संपुष्टात आल्याची स्थिती आदी कारणांमुळे पुढील महिन्यातही कांदादरातील तेजी टिकून राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गत वर्षभरात कांदा उत्पादकांना मात्र आयात-निर्यात धोरणे, आस्मानी संकटे आणि बाजारातील सातत्याने बदलणारी परिस्थिती या सर्व गोष्टींचस्फटका बसला आहे.
Users Today : 45