कांदा, शेवगा कडाडलेलाच, सणासुदीत आवक घटली; इतर भाज्यांचे दर स्थिर

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर : कांदा, शेवगा तसेच आल्याचे दर चढेच आहेत आणि सणासुदीत आवक कमी झाल्याने हे दर पुन्हा जास्त वाढल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र इतर बहुतांश भाज्यांचे दर स्थिर आहे. त्यातल्या त्यात पालेभाज्यांचे दर फळभाज्यांपेक्षा कमी असल्याने सणासुदीत नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.जाधववाडीच्या बाजारात नऊ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळीपूर्वी कांद्याची २२८० क्विंटल आवक होऊन ९०० ते ३३०० रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली होती. तर, गुरुवारी (१६ नोव्हेंबर) १३४९ क्विंटल आवक होऊन २२०० ते ४७०० रुपये क्विंटलने ठोक विक्री होऊन ७० ते ८० रुपये किलोने किरकोळ विक्री झाली. साहजिकच आवक सुमारे एक हजार क्लिंटलने कमी झाली आणि ठोकचे भावदेखील क्विंटलमागे एक हजार रुपयांनी वाढल्याचे स्पष्ट झाले. कांद्याप्रमाणेच शेवग्याच्या शेंगांची स्थिती आहे. नऊ नोव्हेंबर रोजी १४ क्विंटल शेवग्याची आवक होऊन ३००० ते ६२०० रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली होती, तर गुरुवारी नऊ क्विंटल आवक होऊन ७००० ते ११००० रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली. त्याचाच परिणाम म्हणून शेवग्याची सुमारे ६० रुपये पावशेरने किरकोळ विक्री झाल्याचे दिसून आले. त्याशिवाय बहुतांश फळभाज्यांची १५ ते २० रुपये पावशेरने, तर बहुतांश पालेभाज्यांची १० रुपये जुडीने किरकोळ विक्री होत आहे. तसेच बटाट्यांची सुमारे ३० ते ३५ रुपये किलोने किरकोळ विक्री होत आहे. दरम्यान, कांदा, शेवग्याची आवक कमी झाल्याने दर वाढलेले आहेत. इतर भाज्यांचे दर बऱ्यापैकी स्थिर आहेत, असे विक्रेते सोमनाथ शिंदे म्हणाले.

आल्याची तेजी कमी होईना

मागच्या किमान सहा महिन्यांपासून आल्यातील तेजी कायम आहे. पुन्हा सणासुदीत आल्याची आवक कमी झाली असून, त्याचा काहीअंशी फटका किरकोळ दरांवर झाल्याचे दिसून येत आहे. नऊ नोव्हेंबरला ५६ क्विंटल आल्याची आवक झाली आणि ३००० ते ११००० रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली. त्याचवेळी गुरुवारी ३८ क्विंटल आवक होऊन ३५०० ते ९५०० रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली. त्याचा परिणाम म्हणून आल्याची सुमारे ४० ते ५० रुपये पावशेरने किरकोळ विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.

0 9 4 7 9 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *