नागपुरकरांचा श्वास कोंडला; प्रदूषणात वाढ, मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीत महापालिका अपयशी

Khozmaster
3 Min Read

नागपूर : वायुप्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाकडून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे वास्तव आहे. बांधकामाच्या ठिकाणांहून होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक कुठल्याही उपाययोजना नाहीत. शहरातील बांधकामे नियम न पाळता सर्रास सुरू आहेत. शहरात धूळच धूळ आहे. महापालिकाच याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.-शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांवर आधीच ठिकठिकाणी धुळीचे प्रमाण अधिक आहे. त्यातच शहरात मोठ्या संख्येने बांधकामे सुरू आहेत. त्यातच नागपूर रिअल इस्टेटचे हब झाल्याने वर्षभर बांधकामे सुरू असतात.

-अनेक मोठ्या बांधकाम विकासक कंपन्या व बांधकाम व्यावसायिकांकडून ही कामे सुरू आहेत. यापासून होणारे वायुप्रदूषण रोखण्याच्या कुठल्याही उपाययोजनांचे या कंपन्यांकडून पालन होत नसल्याचे दिसून आले आहे.

-उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नगररचना विभागाकडून वायुप्रदूषण रोखण्यासाठी काही नियमावली जारी करण्यात आली असून त्याचे पालन होणे गरजेचे आहे. मात्र, या नियमांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी असलेली महापालिकाच याबाबत फारशी गंभीर नसल्याचे चित्र आहे.-त्यामुळे शहरातील वायुप्रदूषणावर नियंत्रणात येणार कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी नगररचना विभागाने विविध ३० मुद्द्यांचा समावेश असलेली मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. मात्र, याचा काहीच फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे.

-उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिकेवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. प्रदूषण रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत आहे किंवा नाही, याकडे फारसे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

-दिवाळीत फटाके फोडण्यासंबंधी वेळेचे बंधन आखून देण्यात आले होते. असे असताना या नियमाचेही पालन झाले नाही. त्यामुळेही वायुप्रदूषणात चांगलीच वाढ झाली.

मातीने भरलेले ट्रक, धूळच धूळ

बांधकाम साहित्याची वाहतूक करताना ते व्यवस्थित झाकून नेणे गरजेचे आहे. शिवाय, त्यावर पाण्याचा शिडकावा करणे आवश्यक आहे. बांधकामाच्या ठिकाणी उंच पत्रे लावणे गरजेचे आहे. मात्र, यापैकी कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्याचे शहरातील पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. रस्त्यांच्या बांधकामानंतर ठिकठिकाणी धूळ व माती पडलेली दिसते. या मार्गांवरून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून प्रदूषणाचा त्रास नागपूरकरांना सहन करावा लागत आहे.हे पाळले जाते काय?

-५० मीटर उंच इमारतीच्या बांधकामाभोवती २५ फूट उंचीचे धातूचे पत्रे असणे बंधनकारक आहे. तर महापालिकेच्या हद्दीबाहेरील सर्व इमारतींना २० फूट उंचीचे पत्रे लावणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

-सर्व चालू बांधकामे ही ओल्या हिरव्या जाळीने झाकलेली असणे आवश्यक आहे

-धूलीकण निर्माण करणाऱ्या कोणत्याही बांधकाम साहित्यावर वेळोवेळी ठराविक अंतराने पाण्याचा शिडकावा करणे आवश्यक आहे. जेणेकरून धूलीकण वातावरणात पसरणार नाहीत.

-ज्या वाहनांमार्फत बांधकाम साहित्याची ने-आण करण्यात येत आहे, अशी वाहने सर्व बाजूंनी ताडपत्रीने पूर्णपणे झाकलेली बंधनकारक आहे. तसेच त्यात क्षमतेपेक्षा अधिक साहित्य भरलेले असणार नाही, वाहनातील साहित्य रस्त्यात कुठेही पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

-बांधकामाच्या ठिकाणी वायुप्रदूषणाची पातळी मोजणारी उपकरणे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. उपकरणे बसवल्यानंतर प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पातळीवर गेल्यास महापालिकेला यासंबंधीची माहिती देणे आवश्यक राहील-रस्ते, फुटपाथ, पेवमेंट, खुल्या जागा याठिकाणी बांधकाम साहित्य गोळा करता येणार नाही.

0 9 4 7 8 6
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *