Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी आंदोलनात हजेरी, घरी जात नवरा बायकोचं टोकाचं पाऊल, राज्यात हळहळ

Khozmaster
3 Min Read

 बीड : जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यात विविध ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलनं करण्यात येत आहेत. १ सप्टेंबरला जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या घटनेनंतर विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं सुरु करण्यात आलं होती. त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यात देखील आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. बीड जिल्ह्यातील जातेगावातील आंदोलनात एक दाम्पत्य सहभागी झालं होतं. त्या दाम्पत्यानं आंदोलना तून घरी गेल्यानंतर टोकाचं पाऊल उचललं असून दोघांचाही त्यामध्ये मृत्यू झाला. राजेंद्र चव्हाण आणि सोनाली चव्हाण असं या दाम्पत्याचं नाव आहे. गेवराई तालुक्यातील जातेगावात घडलेल्या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.सध्या महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून यामुळे महाराष्ट्रभर गावोगावी रस्त्या रस्त्याने आणि गल्लोगल्ली मराठा आरक्षणासाठी आंदोलने होत आहेत. मात्र या आंदोलनामध्ये याआधी देखील मराठा समाजातील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गेवराई तालुक्यातील चव्हाण दाम्पत्याने जातेगाव येथे चालू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला आणि अचानक काही तासानंतर या दोन्ही पती-पत्नीने काही अंतरावर असलेल्या आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने नेमकं ही आत्महत्या का केली हे प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. मात्र पती-पत्नीने सोबतच आत्महत्या केल्याने संपूर्ण गाव हादरुन गेले आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात काही किलोमीटरवर असलेल्या जातेगावमध्ये रहिवासी असलेले राजेंद्र चव्हाण वय वर्ष ३५ तर सोनाली चव्हाण वय वर्ष २८ या दोघांनी मराठा आरक्षणासाठी गावात ग्रामपंचायत समोर चालू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलनात काही तास त्यांनी घोषणाबाजी केल्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि हा आमचा हक्क आहे अशा एक ना अनेक घोषणाही दिल्या. मात्र, अचानक काय घडलं हे कोणालाच कळलं नाही आंदोलनापासून काही अंतरावर असलेल्या घरी जाऊन त्यांनी गळफास घेतला.ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि आंदोलकांपर्यंत पोहोचली.यानंतर जातेगावातील आंदोलन तात्काळ मागे घेत घटनास्थळी सगळ्यांनी धाव घेतली. मात्र, यावेळेस राजेंद्र चव्हाण यांचा मृतदेह हा लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला तर त्यांच्या पत्नी सोनाली चव्हाण यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. मात्र, ही घटना का घडली? नेमकं कारण काय हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. मात्र, या घटनेनंतर तर्क वितर्क लावले जात आहेत. या घटनेनंतर तात्काळ दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात नेऊन शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यात आला आहे. मात्र, या दाम्पत्यांना दोन चिमुकल्या मुली आहेत. वडील, दोन भाऊ आणि दोन चिमुकल्या मुली असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे. मात्र, या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 9 4 7 8 6
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *