अमरावती: दिवाळीनंतर सध्या शेतामध्ये गहू आणि कांदा पेरणीची लगबग सुरू आहे. अशातच दिवाळीमुळे वातावरणात प्रदूषण निर्माण झाल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. याच पार्श्वभूमीवर आंध्राच्या किनारपट्टीवर डिप्रेशन तयार झाले आहे. डीप डिप्रेशनमुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती राहणार आहे. याबाबत हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनिल बंड यांनी माहिती दिली आहे.आंध्र किनारपट्टीवर डीप डिप्रेशन सक्रिय आहे. त्यानंतर त्याची दिशा बदलुन ते उत्तर -ईशान्य दिशेने ओरिसा किनारपट्टीवर आज (१७ नोव्हेंबर) पोहोचण्याची शक्यता आहे. याची दिशा बदलल्याने विदर्भात या वादळाचा विशेष परिणाम होण्याची शक्यता नाही. हे वादळ आज चक्रीवादळामध्ये रूपांतरीत होऊन १८ तारखेला ते बांगलादेशला खेपुपाराजवळ पार करण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ७०-८० किमी तास राहण्याची शक्यता आहे.
एक आनखी चक्राकार वारे श्रीलंका किनारपट्टीवर सक्रिय आहे. याचे सुद्धा कमी दाबाचे क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे केरळ तामिळनाडू कर्नाटकमध्ये विखुरलेल्या स्वरुपात मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. परंतु विदर्भात २६ तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही. काही दिवशी अंशतः ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान ३२-३३ तर किमान तापमान १४-१६° च्या आसपास राहणार असल्याची माहिती प्राचार्य अनिल बंड यांनी दिली आहे.
Users Today : 26