नवी मुंबई : गेली १२ वर्ष प्रतीक्षेत असणारी नवी मुंबई मेट्रो शुक्रवारी दुपारी तीन वाजता बेलापूर ते पेंधर या मार्गावर धावली. ११ किमी अंतराचा हा मेट्रो प्रकल्प गेली अनेक वर्ष प्रलंबित होता. अनेक अडथळे पार करून अखेर शुक्रवारच्या मुहूर्तावर मेट्रो सुरू झाली. दर १५ मिनिटांनी मेट्रोची एक फेरी असून एका मेट्रोची किमान एक हजाराहून अधिक क्षमता आहे.काल दुपारी तीन वाजता पूजन झाल्यावर मेट्रो पेधरच्या दिशेने रवाना झाली. मेट्रो सुरु झाली, याबाबत लोकांच्या मनात समाधान असले, तरी तिकीट दर सर्वसामान्य प्रवाशांच्या खिश्याला परवडणारे असावे, अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे.
चाळीसऐवजी २० ते ३० रुपये इतका तिकीट दर मेट्रोला ठेवल्यास तो परवडेल, असं काही जणांचं म्हणणं आहे. बेलापूर ते पेंधर हा मेट्रो प्रवास तळोजामधील कामगार वर्गासाठी अत्यंत फायद्याचा आहे. त्यामुळे तळोजा नोडला आता चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.”नवी मुंबईकरांचे स्वप्न साकार झाले आहे. मेट्रो हा सार्वजनिक वाहतुकीत जलद, आरामदायी आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय देईल. तळोजा आणि खारघर नोड्समधील रहिवाशांना सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी पर्याय प्रदान करेल. नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याच्या प्रयत्नात मेट्रो ही एक योग्य वाहतूक सेवा आहे” असे सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर म्हणाले.नवी मुंबईसाठी ११ स्थानकांसह ११.१० किमीचा मेट्रो मार्ग तांत्रिक आणि कायदेशीर समस्यांमुळे पूर्ण होण्यास १२ वर्षे लागली, जरी सिडकोने भूमिपूजन समारंभाच्या तीन वर्षांत पहिली लाईन पूर्ण करून ती कार्यान्वित करण्याची योजना आखली होती. नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा सीबीडी बेलापूर ते पेंधरपर्यंत सुरू झाला आहे.शनिवारपासून पहिली मेट्रो सकाळी सहा वाजता दोन्ही टोकांवरून धावेल आणि शेवटची मेट्रो रात्री १० वाजता धावेल. या मार्गावर दर १५ मिनिटांनी एक मेट्रो असेल.
Users Today : 25