छत्रपती संभाजीनगर: समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेने जोरदार निदर्शने केली. पाणी न सोडल्यास मराठवाड्यातील एक हजार ग्रामपंचायतींच्या ठरावासह आंदोलन व्यापक करण्याचा इशाराही देण्यात आला.
नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय रखडला आहे. जलसंपदा विभागाच्या आदेशाला उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरणात तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेने शुक्रवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात राजकीय पक्ष, स्वयंसेवी-सामाजिक संस्था, शेतकरी संघटना, मसिआ उद्योजक संघटना, किसान मोर्चा, समृद्धी साखर कारखाना यांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी, महिला, युवक सहभागी झाले होते.
सोमवारी रास्ता रोको
न्यायालयाच्या निर्णयानुसार समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने सोमवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोदावरी खोरे विकास महामंडळ कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी कळविले आहे.
Users Today : 25