छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वादावर रामदास आठवलेंचे वक्तव्य, म्हणाले…

Khozmaster
2 Min Read

पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी मांडली. तसेच छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपापसातील वाद मिटवावेत, अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.

तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसी कोट्यामधून मिळालेले आरक्षण हे कोर्टामध्ये टिकणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी भुजबळांचीही भूमिका आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटीलही योग्य दिशेने काम करत आहेत, असे आठवले म्हणाले. तसेच समाजातून जातीयवाद संपला पाहिजे. जातनिहाय जनगणना केली पाहिजे. त्यानुसार प्रत्येक जातीला आरक्षण मिळाले पाहिजे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. कोरेगाव भीमा येथे भव्य स्मारक व्हावे, यासाठी आम्ही अग्रेसर राहू. तसेच नवीन संसद भवनाला संविधान भवन असे नाव दिले जाईल, असेही आठवले म्हणाले.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा संदर्भ घेत, मला इशारा देतं माझं वॉच, रोहित शर्माची टीम घेणार ऑस्ट्रेलियाच्या १० कॅच, का जिंकणार नाही आपण ही मॅच?, अशी खास आपल्या शैलीतील कविता आठवले यांनी ऐकवली. तसेच ही मॅच आपल्याला कोणत्याही परिस्थिती जिंकायची आहे. मोदींच्या टीमनेही चांगली तयारी केली आहे. मी राहुल गांधींचा कॅच घेणार आहे. मी त्यांना शून्यावर आऊट करणार आहे, असा टोलाही आठवले यांनी लगावला. मोदी अॅक्टिव्ह खेळाडू असून २०२४ मध्ये ३५० हून अधिक धावा करणार आहोत, असेही आठवले म्हणाले.
0 9 4 7 8 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *