अंजली दमानियांकडून भुजबळ कुटुंबावर गंभीर आरोप; समीर भुजबळ अब्रूनुकसानीचा दावा करणार

Khozmaster
3 Min Read

नाशिक : अंजली दमानियांकडून भुजबळ कुटुंबीयांची बदनामी सुरू असून, त्या फर्नांडिस कुटुंबीयांचा राजकारणासाठी वापर करीत आहेत. या कुटुंबाने राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार समीर भुजबळ यांनी रविवारी नाशिकमध्ये केले. दमानियांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.दमानियांकडून होणाऱ्या आरोपांबाबत भुजबळांनी खुलासा केला. ते म्हणाले, की ओबीसींच्या हक्कांसाठी महाएल्गार सभा पार पडली. या सभेमुळे भुजबळ चर्चेत येताच दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ व कुटुंबीयांची बदनामी सुरू केली. दमानियांकडे वकिलांची मोठी फौज असताना फर्नांडिस कुटुंबाच्या प्रकरणासाठी २०१७ पासून त्यांनी वकील का दिला नाही, असा सवाल भुजबळ यांनी केला. आम्ही खरेदी केलेली जागा बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असून, फ्रान्सिस फर्नांडिस जागेचे मालक होते. त्यांनी ही मालमत्ता मुलगी शैला अथायडे यांना दिल्याने त्या या जागेच्या मालक झाल्या. अथायडे यांनी या जागेसंबंधीचे हक्क भाऊ फर्नांडिस व त्यांच्या पत्नीला दिले. सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स या रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत या जागेसाठी व्यवहार झाला. परंतु, त्यांनी दहा वर्षे काम न केल्याने फर्नांडिस नव्या विकसकाच्या शोधात होते. सोसायटीचे सचिव फ्रेडरिक नऱ्होना यांच्या माध्यमातून ते आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शनच्या संपर्कात आले. रहेजांच्या कंपनीसोबतचे व्यवहार पूर्ण करून फर्नांडिस दाम्पत्याच्या सहमतीने पुढील करार करण्यात आला. फर्नांडिस कुटुंबीयांना त्याच सोसायटीत फ्लॅट देण्याचे ठरले. परंतु, हे आम्हाला मान्य नाही, नऱ्होना यांच्याशी आमचे पटत नाही व त्यांनी पैसेही दिले नसल्याचे फर्नांडिस सांगू लागले. मधल्या काळात ‘ईडी’ने ही मालमत्ता जप्त केली. या प्रकरणात अपिलीय ट्रिब्युनलकडे दाद मागण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. परंतु, त्यांच्या वकिलांनी अजून याबाबत पावले उचललेली नाहीत. हे प्रकरण मिटू नये व त्याचा राजकीय हत्यार म्हणून वेळोवेळी वापर करता यावा हाच या मागील हेतू असल्याचा आरोप भुजबळांनी केला.

सुप्रिया सुळेंची मध्यस्थी

गेल्या वर्षी दमानिया यांनी खासदार सुप्रिया सुळेंमार्फत या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न केला. आम्हीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. क्लाऊड फर्नांडिस यांच्या निधनामुळे सुरुवातीलाच या कुटुंबाला ५० लाखांचा धनादेश विनाअट दिला. त्यांनी तो स्वीकारला, परंतु वटविला नाही. सुळेंच्या मध्यस्थीमुळे आम्ही सर्व अटी-शर्ती बाजूला ठेवल्या. मोबदला देणे आमची जबाबदारी नसतानाही तो देण्याची तयारी दर्शविली. यापुढे न्यायालय जो निकाल देईल तो मान्य असेल, असे भुजबळांनी स्पष्ट केले….म्हणून भुजबळ आक्रमक

दोन महिन्यांपासून मनोज जरांगे छगन भुजबळांवर सातत्याने टीका करीत होते. परंतु, वाद नको म्हणून आम्ही शांत होतो. आमचा संबंध नसतानाही टीका सुरूच राहिली. बीडमध्ये जाळपोळ व तोडफोडीचे प्रकार सुरू झाल्याने छगन भुजबळ आक्रमक झाल्याचे समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले.

0 9 4 7 8 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *