छोटे, किशोरवयीनांनाही मूळव्याधीच्या वेदना; पालकांनी आताच जाणून घ्या कारणं…

Khozmaster
2 Min Read

नागपूर : मूळव्याध हा पूर्वी विशिष्ट वयानंतर होणारा आजार होता. मात्र, गेल्या काही वर्षांत लहान तसेच किशोरवयीनांमध्येही तो बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही मुलांमध्ये हा आजार अनुवांशिक आहे, तर काहींना खाण्यापिण्याच्या सवयी तसेच बदललेली जीवनशैली यामुळे तो होत आहे. घरात आई, वडील, आजी- आजोबा किंवा रक्तातील अन्य नातेवाइकांना हा आजार असल्यास अनेकदा मुलांनाही होतो असे सांगून मूळव्याध तज्ज्ञ डॉ. प्रवीण गुप्ता म्हणाले की, ‘दुसरे कारण बदलली जीवनशैली आहे. आज मुलांचे बाहेर खेळणे, व्यायाम करणे बंद झाले आहे. तसेच अतितिखट, तेलकट पदार्थांचे सेवन घातक ठरत आहे.

काही घरांमध्ये तिखट, तेलकट खाण्याची जणू परंपरा असते. त्याचा परिणाम मुलांवर होतो आणि त्यांना बालपणीच हा आजार जडतो. शहरी भागात ६८ ते ७० टक्के मुले कोणताही शारीरिक व्यायाम करीत नाहीत. त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गर या मैदा जास्त असलेल्या पदार्थांमुळे आतड्यांची हालचाल कमी होते व बद्धकोष्ठता होते. दुसरे असे की, आता घरोघरी कमोड वाढले आहेत. भारतीय पद्धतीच्या शौचालयात गुडघ्यांचा भार पोटावर पडून मलनि:स्सारण होते. शिवाय, पाय दुखतात म्हणून कोणीही फार वेळ त्या अवस्थेत बसू शकत नाहीत. मात्र, आरामदायी कमोडमुळे हाती मोबाइल घेऊन तेथे बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेही मूळव्याधीचे रुग्ण वाढत आहेत, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. लहान मुलांना त्रास झाला तरी अनेकदा ते घरी सांगत नाहीत. काहीजण इंटरनेटवर आपल्याला नेमके काय झाले, याचा शोध घेऊन स्वत:च औषधे घेतात. त्यामुळे तात्पुरता आराम पडतो पण गुंतागुंत वाढत जाते.’

वर्षभरापूर्वी आपण एका सहा वर्षांच्या मुलावर आणि अलीकडे १३, १५ वर्षांच्या मुलांवर शस्त्रक्रिया केल्याची माहितीही डॉ. गुप्ता यांनी दिली. त्यामुळे मुलांना व्यायामाची तसेच बाहेर खेळण्याची सवय लावण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले आहे.
0 9 4 7 8 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *