उपराजधानीत महिन्याला २५ ठार, तर ९३ होतात जखमी; २३ ब्लॅकस्पॉट, कोणत्या भागात सर्वाधिक घटना?

Khozmaster
2 Min Read

नागपूर : उपराजधानीतील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी झाडाआडून केवळ ‘चालान’वर लक्ष केंद्रित करीत आहेत. अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वाहतुकीवरील नियंत्रण सुटल्याने उपराजधानी ही अपघातांची राजधानी ठरू पाहात आहे. नागपुरात दर महिन्याला होणाऱ्या अपघातात तब्बल २५पेक्षा अधिक जण ठार तर ९३ जण जखमी होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

आज, सोमवारी रस्ता वाहतूक बळींचा जागतिक स्मृतिदिन आहे. यानिमित्त तरी वाहतूक पोलिस जागे होऊन अपघातांवर नियंत्रण मिळवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पादचारी सर्वाधिक

गेल्या दहा महिन्यात नागपुरातील विविध ठिकाणी झालेल्या अपघातात २५२ जण मृत्युमुखी पडले तर ९३९ जण जखमी झाले. जखमी व मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पादचाऱ्यांचा समावेश आहे. जानेवारीत तीन पादचारी ठार, १२ जखमी, फेब्रुवारीत ११ ठार, १९ जखमी, मार्चमध्ये ७ ठार, १७ जखमी, एप्रिलमध्ये ११ ठार, ९ जखमी, मेमध्ये ७ ठार २१ जखमी, जूनमध्ये १४ ठार व तेवढेच जखमी, जुलैत ७ ठार, १३ जखमी, ऑगस्टमध्ये ६ ठार, १५ जखमी, सप्टेंबरमध्ये ६ ठार २८ जखमी आणि ऑक्टोबरमध्ये ९ पादचारी ठार तर १० जण जखमी झाले.दृष्टिक्षेपात…
महिना जखमी मृत्यू
जानेवारी १०० ११
फेब्रुवारी ९९ २२
मार्च १२२ २८
एप्रिल १०० २१
मे ७४ २५
जून ६० ३४
जुलै ५६ २३
ऑगस्ट १३३ २८
सप्टेंबर ९८ ३५
ऑक्टोबर ९७ २५
१० ९३९ २५२शहरात २३ ब्लॅकस्पॉट

उपराजधानीत तब्बल २३ ब्लॅकस्पॉट आहेत. त्यात पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना पारडी नाका चौक, हनुमान मंदिर, प्रकाश हायस्कूल चौक, कापसी पूल, यशोधरानगर, कपिलनगरमधील मारुती शोरूम चौक, उप्पलवाडी पूल, जरीपटक्यातील जरीपटका चौक, खोब्रागडे चौक, यशोधरानगरमधील विटाभट्टी चौक, चिंचभुवन पूल, प्रतापनगरमधील छत्रपती चौक, वाठोडा-हुडकेश्वरमधील दिघोरीतील टेलिफोननगर चौक, सक्करदरा-हुडकेश्वर-वाठोड्यातील चामट चक्की चौक, दिघोरी पुलाजवळील भंगार दुकानासमोर, सोनेगावमधील महेश ढाबा, अजनीतील मानेवाडा चौक, म्हाळगीनगर चौक, वाडीतील आठवा मैल, वडधामना, हिंगण्यातील डोंगरगाव, एमआयडीसीतील राजीवनगर, आयसी चौक, सीताबर्डीतील महाराजबाग चौक आदींचा समावेश आहे. या ब्लॅकस्पॉटवर ऑक्टोबर अखेरपर्यंत सात प्राणांतिक अपघाताच्या घटना घडल्या असून, नऊ गंभीर अपघातांची नोंद पोलिसदफ्तरी झाली. या ठिकाणी झालेल्या अपघातात चार पुरुष व तीन महिलांचा मृत्यू झाला. तर १२ पुरुष व चार महिला जखमी झाले.

0 9 4 7 8 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *