आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मराठ्यांवर आली: मनोज जरांगे पाटील

Khozmaster
4 Min Read

पुणे: मराठा समाजाला ७० वर्षांपूर्वीच आरक्षण मिळाले असते तर आज मराठा ही जगातील सर्वात प्रगत जात ठरली असती. आम्हाला आरक्षण असतानाही आमच्या समाजाची लाखो मुलं बेरोजगार आहेत. आम्ही हुशार असतानाही ज्यांची लायकी नाही, अशा लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते सोमवारी पुण्यातील खराडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत मराठा आरक्षण कशाप्रकारे गरजेचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आरक्षणासाठी आमच्या लेकरांचे मुडदे पडायला लागले आहेत. हे आता सहन होणारे नाही. त्यामुळे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावंच लागेल. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही, असे मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले. तसेच ओबीसी आरक्षणाच्या एकाही टक्क्यालाही धक्का लागला नाही पाहिजे, ही मराठा समाजाची आजही भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माझा मराठा समाज सगळ्यांच्या कल्याणसाठी उभा राहिला. कधी जातीवाद नाही केला, सगळ्यांच्या पाठीवरून हात फिरवला. कोणत्याही समाजाचा माणूस आला तरी माणुसकी जागी व्हायची, कधी कोणाची जात पहिली नाही. प्रत्येकाच्या सुखदुःखात माझा बापजादा मराठा धावून गेला. स्वतःच्या लेकराला एक वेळचं खायला दिलं नाही, पण दुसऱ्याच्या लेकराला उपाशी राहू दिलं नाही. जात माझ्या मायबाप मराठ्याला शिवली नाही, त्यांनी लोकांचा द्वेष केला नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

‘मराठ्यांनी मोठे केलेले लोकच आता आमच्याकडे ढुंकून पाहत नाहीत’

आरक्षण देताना कोणाला मिळालं आणि कोणाला मिळालं नाही, याबाबत ब्र काढला नाही. मराठा दिलदार मनाने का उभा राहिला? इतर समाजाचा व्यक्ती मोठा होण्यासाठी मदत केली. आम्ही देताना मागेपुढे पाहत नाही, आम्ही आजही देताना मागेपुढे पाहत नाही. आम्ही ज्यांना ज्यांना मदत केली ते आम्हाला वेळ आल्यावर उभा राहतील असं वाटत होतं. सगळ्या नेत्यांना मोठं करण्याचं काम मराठ्यांनी केलं, त्यांच्यात जात पहिली नाही. पण ज्यांना मोठं केलं ते आज आमच्या मदतीला येत नाहीत. आमची अशी काय चूक झाली की, आम्ही मोठे केलेले लोक मराठ्यांकडे ढुंकून पाहत नाही, आमच्या बापजाद्याची तीच चूक झाली. ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनीच घात केला. ज्यांना मोठं केलं तो तरी मदतीला येईल, ही आशा आता मावळली आहे. ज्यांना मदत केली तेही पाठीशी नाहीत. ही संघर्षाची वेळ आहे आता तरी जागे व्हा. सगळ्या समित्या झाल्या त्यांनी पुरावे शोधले. मात्र, बुडाखाली पुरावे लपून ठेवले आणि म्हणाले पुरावे नाहीत. विदर्भातील मराठ्यांचा व्यवसाय शेती, माळी बांधवांचा व्यवसाय शेती, मग मराठ्यांना कुणबी आरक्षण का नाही? समितीने काम सुरु केले आणि मराठ्यांचे पुरावे सापडू लागले. महाराष्ट्रात आत्तापर्यंत २९ लाख नोंदी सापडल्या, जर आम्ही आरक्षणात होतो तर ७५ वर्षे आमचं वाटोळं कोणी केलं? आता आम्हाला आरक्षण कोणी दिलं नाही. त्याच नाव आता आम्हाला हवं,असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका

भुजबळ साहेब तुम्हाला आमचा वैयक्तिक विरोध नव्हता. आम्ही तुम्हाला मानत होतो, तुमचा आणि आमचा वैचारिक विरोध होता. तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणून विरोध होता. पण आता तुम्हाला व्यक्ती म्हणून पण आमचा विरोध घटनेच्या पदावर बसून सर्व सीमा ओलांडल्या. म्हणून आमचा तुम्हाला विरोध आहे. ३५-४० वर्ष झाले आपण सत्तेत आहात, तरीदेखील मराठा समाजाच्या विरोधात एवढी विषारी भूमिका का? जातीजातीत दंगली होतील, असे वक्तव्य करायला लागलेत. पण आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. गाव खेड्यातील ओबीसी बांधव म्हणतोय जर नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिल पाहिजे. आपल्या नेत्याने विरोध केला नाही पाहिजे. यांच्या राजकीय स्वर्थासाठी तेढ निर्माण केली आहे. मराठा बांधवांना माझी विनंती आहे, याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. पण तुम्ही यांचे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. आपल्याला राग येईल, असं हे बोलत आहेत. पण आता विजयची वेळ जवळ आहे. तुम्ही शांत रहा आणि सलोखा जपा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला.

0 9 4 7 7 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *