पुणे : संयुक्त राष्ट्रांकडून ठरवून देण्यात आलेल्या दहशतवादविरोधी मोहिमांसाठी; तसेच युद्धक्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आखलेल्या मोहिमांसाठी जगभरातील अनेक देश एकत्रित लष्करी सराव करून अशा मोहिमांसाठी सज्ज होत असतात. याच हेतूने भारत आणि श्रीलंका यांच्यामधील मित्रशक्ती-२०२३ हा संयुक्त लष्करी सराव पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन येथे सुरू झाला आहे. १६ नोव्हेंबरला सुरू झालेला हा सराव २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
भारताच्या मित्र देशांच्या लष्कराशी संवाद साधून विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर, सीमा संरक्षणावर संवाद साधण्याचे कार्य भारतीय लष्कर करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘मित्रशक्ती’ या नावाने संयुक्त लष्करी सराव केला जातो. या मध्ये भारताच्या सीमेलगत असलेल्या श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान या मित्र देशांचे लष्करी अधिकारी, जवान व भारतीय लष्करातील अधिकारी, जवान एकत्र येऊन लष्कराच्या विविध मोहिमांचा सराव करतात. त्यामध्ये दहशतवादविरोधी कारवाया, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आखलेल्या मोहिमा, ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका याचा समावेश असतो. मित्रशक्ती-२०२३ मध्ये अशाच पद्धतीचा सराव भारताचे १२०, तर श्रीलंकेचे ५३ जवान करणार आहेत. आतापर्यंत श्रीलंकेसोबत होत असलेला हा नववा संयुक्त सराव आहे.या सरावाचे महत्त्व काय?
प्रत्येक देशाच्या लष्कराची काम करण्याची, मोहिमा आखण्याची पद्धत काहीशी वेगळी असते. मित्र देशांना ती पद्धत माहीत असेल, तर एकत्रित मोहिमा करताना त्याचा फायदा होऊ शकतो. एकत्रित लष्करी सराव केल्याने मोहिमांच्या वेळी अपेक्षित असलेला संवाद आणि समन्वय साधणे सोपे जाते. यातून दोन्ही लष्करांमधील अधिकारी, जवान यांच्यातील मैत्रीची भावना वाढते. याशिवाय आंतरराष्ट्रीय संबंधही सुदृढ होतात. भारतासारख्या देशाला श्रीलंकेचा मोठा भाऊ म्हणून लष्करी पातळीवर मदत करणे, हादेखील या सरावाचा प्रमुख उद्देश आहे.
भौगोलिक-राजकीय महत्त्व काय?
श्रीलंका हा देश भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहे. दक्षिण हिंदी महासागरामध्ये वाढत चाललेला चीनचा प्रभाव रोखण्यासाठी भारताला श्रीलंकेला जवळ ठेवणे गरजेचे असून सर्व बाबतीत सहकार्य करूनच ही गोष्ट साध्य केली जाऊ शकते. हिंदी महासागरातील भारताच्या प्रभावामध्ये बाधा आणण्याचे काम चीनकडून सातत्याने केले जात आहे. उत्तर श्रीलंकेतील जाफना परिसरात चीनकडून अनेक प्रकारच्या बांधकामांची कंत्राटे घेण्यात आली आहेत. एक प्रकारे याद्वारे नियंत्रण प्रस्थापित करण्याचा चीनचा डाव आहे. तो मोडून काढायचा असेल, तर श्रीलंका आणि भारताच्या संरक्षण यंत्रणांनी एकत्र काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Users Today : 16