कोल्हापूरचा ५० वर्षांचा पाणीप्रश्न मिटला, सतेज पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण, सर्वपक्षीयांकडून सत्कार

Khozmaster
4 Min Read

कोल्हापूर : सतेज पाटील यांनी मला वचन दिलं होतं आणि ते आज पूर्ण झालं. त्यांनी थेट पाईपलाईन योजनेमध्ये पुढाकार घेऊन सर्व अडचणी दूर केल्या, यामुळे आता कोल्हापूरकरांना दररोज २०० लिटर पाणी मिळेल. सतेज पाटील यांच्या मनात काय असतं, कोणाला नाही कळत, ते जे ठरवतात ते घडवून आणतात. यामुळे त्यांची कारकीर्द गाजली आहे. यामुळे सतेज पाटील यांना साथ देण्याची आपल्याला गरज आहे, अशा शब्दात शाहू महाराज छत्रपती यांनी सतेज पाटील यांचं कौतुक केलं आणि थेट पाईपलाईन योजना पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं.ही योजना केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती त्यामुळे पूर्ण झाली. माझ्या मुख्यमंत्री काळातील भूमीपूजनाचा हा सगळ्यात मोठा आणि शेवटचा कार्यक्रम होता. पाणी आले नाही, तर निवडणुकीला उभारणार नाही सतेज पाटील म्हणत होते आणि माझा राईट हॅंडच उभा राहणार नाही म्हटल्यावर मलाच वाईट वाटले होते, असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कौतुक केलं.
  हत्ती आणून जलाभिषेक

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली आणि आमदार सतेज पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला काळमावाडी थेट पाईपलाईन प्रकल्प हा पूर्ण झाला आहे. काळमवाडीचे पाणी हे पुइखडी येथील केंद्रावर आले आणि तेथून संपूर्ण कोल्हापुरात पोहोचले. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे कोल्हापूरकरांचा पुढील ५० वर्षांचा पाणी प्रश्न मिटल्याने काल दसरा चौकात सर्वपक्षीय गौरव समितीतर्फे आयोजित थेट पाइपलाइन वचनपूर्ती लोकसोहळ्यात आमदार सतेज पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. यावेळी या थेट पाईपलाईन योजनेमध्ये सहकार्य लाभलेल्या समाजातील सर्व नागरिक, अधिकारी, माजी महापौर यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमास आमदार पी.एन. पाटील, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, राजूबाबा आवळे, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते. यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी हत्ती आणून दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या चरणी जलाभिषेक केला तर हत्ती कार्यक्रमाच्या ठिकाणी आणून सतेज पाटील, शाहू महाराज छत्रपती आणि पृथ्वीराज चव्हाण यांनाही अभिवादन केले.

केंद्रात, राज्यात आणि कोल्हापुरात काँग्रेसची सत्ता होती

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, केंद्रात, राज्यात काँग्रेसची आणि कोल्हापूर महापालिकेत सतेज पाटील यांची सत्ता असताना थेट पाइपलाइन योजना मंजूर झाली. सतेज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रातून योजनेच्या ६० टक्के हिश्श्याचे १७० कोटी महापालिकेच्या खात्यावर जमा झाले. त्यानंतर आमचे सरकार गेले. यानंतर अनेक योजनांना स्थगिती मिळाली पण पहिला हप्ता खात्यावर जमा झाल्याने थेट पाइपलाइन योजनेला स्थगिती मिळाली नाही. त्यानंतर अनेक अडचणी येत गेल्या पण सतेज पाटील यांच्या चिकाटीमुळे योजना मार्गी लागली. माझ्या मुख्यमंत्री काळातील भूमीपूजनचा हा सगळ्यात मोठा आणि शेवटचा कार्यक्रम होता. पाणी आले नाही, तर निवडणुकीला उभा राहणार नाही सतेज पाटील म्हणत होते. आणि माझा राईट हॅंडच उभा राहणार नाही म्हटल्यावर मलाच वाईट वाटलं. पण ही योजना झाली, आठवणीने आम्हाला आजच्या कार्यक्रमाला बोलवले असे म्हणत सतेज पाटील यांच्याबद्दल गौरवोद्‌गार काढले.

यापुढे आयटी पार्कसाठी पाठपुरावा करणार

शहराला स्वच्छ, मुबलक पाण्याचे पन्नास वर्षांचे स्वप्न पूर्ण करता आले. हे माझ्या एकट्याचे योगदान नसून कोल्हापूरकरांचे यासाठी मोठे श्रेय आहे. योजना मंजूर करून घेण्यापासून पूर्ण करण्यापर्यंत अनेक अडचणी आल्या. योजना पूर्ण झाली नाही तर विधानसभा लढवणार नाही अशी घोषणा केली होती. ती पूर्ण होण्यासाठी राज्य, केंद्र सरकारकडे प्रचंड पाठपुरावा केला. असे आमदार सतेज पाटील म्हणाले. तसेच ही योजना होत असताना माझ्यावर केलेली टीका माझ्या फायद्याची ठरली. या टीकेमुळे नागरिकांनी म्हटलं की योजना झाली नाही तर त्याला सतेज पाटील जबाबदार आणि झाली तरी सतेज पाटीलच जबाबदार, मात्र आता जशी ही योजना पूर्ण केली, तसेच आता यापुढे आयटी पार्कसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *