कोल्हापूर : तीन तास अभिनय करून सादर केलेले नाटक दीर्घकाळ रसिकांच्या आठवणीत राहते. यात शाश्वततेचा आनंद आहे, तो माणूसपण विकसित होण्याचा मार्ग आहे; मात्र काही सेकंद किंवा मिनिटांचा व्हायरल व्हिडिओचा आनंद क्षणिक आहे. यात शाश्वतता असेलच असे नाही. ही वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल, असं स्पष्ट मत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Actor Sankarshan Karhade) यांनी व्यक्त केले.सविस्तर कला आस्वादातून दीर्घकाळाचे समाधान मिळवायचे की, व्हायरलच्या क्षणिक आनंदात समाधान मानायचं, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही अभिनेता कऱ्हाडे यांनी सांगितले. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, महालक्ष्मी सहकारी बॅंक व तेंडुलकर परिवार यांच्या वतीने सुरू असलेल्या तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘नाट्यक्षेत्र व्हायरल आणि वस्तुस्थिती’ या विषयावर ते बोलत होते.कऱ्हाडे म्हणाले, ‘नव्या काळात आपण कमालीचे तंत्र वापरकर्ते झालो आहोत. व्हायरल गोष्टी पाहताना त्यात स्वतःला हरवून जातो. आपलाच आपल्याला विसर पडतो. आम्ही एखादे नाटक सादर करतो. रसिक रंगमंचामागे येतात, नाटक कसे झाले, तुमची कोणती कलाकृती कशी आवडली यापेक्षा सेल्फी आडवा, उभा घेण्यात रमतात. यातून कलाकृतीचा संपूर्ण आनंद घेण्याला मर्यादा येतात, हेही दिसून येते. अशा प्रत्येक गोष्टीत आपण व्हायरल गोष्टीत रमताना, घरातील जुने फोटो पाहताना आठवणी जाग्या करणे, एखाद्या व्यक्तीविषयी संवाद साधू पाहणे, हे तुटत चालले आहे तसा माणूस आत्मकेंद्रित बनत आहे.’अनेकदा कलाकार दौरे, नाटक, चित्रीकरण, सततचा प्रवास यातून थकलेले असतात. अचानकपणे कोणीतरी रसिक येतो. सेल्फी घेण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. दमलेला, भागलेला कलावंत कळत न कळत चुकीचे बोलतो किंवा कृती करतो. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा त्या कलाकाराने कित्येक वर्षे कला सादरीकरणातून कमावलेल्या लौकिकाला बाधा पोहचते. अशा व्हायरलचा फटका केवळ कलाकारालाच नाही, तर लोकाभिमुख क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी बसतो. साहजिकच व्हायरल ही बाब गंभीर बनली आहे; मात्र त्या चुकीच्या कृत्यामागील वस्तुस्थिती समजून घेणे महत्त्वाचे असते, असे कऱ्हाडे यांनी सांगितले.
Users Today : 43