नागपूर : राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून तिथे औषधे उपलब्ध नाहीत. रुग्णमृत्यू वाढले आहेत. औषधखरेदी थांबलेली आहे, या आरोपांसह महाविकास आघाडीने मंगळवारी विधानभवन परिसरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना लक्ष्य करत आंदोलन केले.
तोंडाला मास्क लावून, गळ्यात स्टेथोस्कोप घालून आणि स्ट्रेचर आणून विरोधकांनी आरोग्यव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचा आरोप केला. ‘जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘नाही औषध नाही गोळी, आरोग्य व्यवस्थेची झाली होळी’, ‘शासकीय रुग्णालयात नाहीत डॉक्टर नाहीत नर्सेस, त्यामुळे वाढताहेत मृत्यूच्या केसेस’ असे फलक घेऊन सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.गेल्या चार महिन्यांत चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ४३६; तर नांदेड, ठाणे-कळवा आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्येकी २४ मृत्यू झाल्याकडे विरोधकांनी लक्ष वेधले. राज्यभरातील विविध शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू वाढला आहे. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आरोग्य व्यवस्थेचे पुरते तीन-तेरा वाजले आहेत, असे म्हणत विरोधकांनी तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर, विकास ठाकरे, सतेज पाटील, यशोमती ठाकूर आदी सहभागी झाले होते.सरकार अपयशी ठरले आहे…
राज्याची आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. औषधखरेदी होत नसल्याने गरीब रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागतात. शासकीय रुग्णालयात सुविधा नसल्यामुळे खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. याचा निषेध म्हणून आम्ही आरोग्यमंत्री आणि आरोग्य यंत्रणेविरुद्ध प्रतीकात्मक आंदोलन केले आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
Users Today : 18