नागपूर : राज्यात आजवर आठ वेळा मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. आता मराठ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पक्ष मराठ्यांना मुख्यमंत्री बनवावे अशी हास्यास्पद मागणी करत आहेत. मराठेच आपल्या समाजाला न्याय देऊ शकले नाहीत तर ओबीसी मुख्यमंत्री हे करू शकेल, असा उपरोधिक सवाल अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना कडू असेही म्हणाले की आता आंदोलने ही शक्तीने नव्हे तर युक्तीने आणि डावपेचांनी लढली जातात. या डावपेचांमध्ये कोण कुणाच्या बाजूने हे चेहरे बघितले तरी लक्षात येते, असेही कडू म्हणाले.हक्काची लढाई आता कमकुवत झाली आहे आणि जात-धर्माची लढाई जास्त मजबूत झाली आहे. मजुरांच्या मजुरीची, शेतकऱ्यांच्या हमीभावाची, कामगारांची लढाई न होता जातीसाठीच्या लढाईलाच जास्त जोर चढला आहे. राजकारण्यांनी जातीची लढाईपोटी हक्काच्या लढाईकडे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.धरणग्रस्तांच्या प्रश्नांसदर्भातही त्यांनी सरकारवर टीका केली. धरणग्रस्तांच्या जमिनी घेऊन त्यांचे पुनर्वसन आणि लाभाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. एखादा मोठा व्यापारी जसा सामान्यांना लुटतो, तसे सरकारही ही सामान्य माणसाला लुटते, असाही आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
Users Today : 21