विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महायुतीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या १२५ जागांची चर्चा कानावर आली. महायुती म्हणून जागावाटपाबाबत आम्ही एकजुटीने आणि सन्मानाने त्यांच्या पुढे गेलो आहोत. महायुतीचे जागावाटप लवकरच जाहीर होईल,’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्येच रस आहे. बारामती त्यांच्या ‘डीएनए’मध्ये आहे,’ असे सांगून तटकरे यांनी अजित पवार हे बारामतीमधूनच लढणार असल्याचे सूतोवाच केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र व्हीजन २०५०’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरसिटणीस मीनाक्षी गुरव आणि उपाध्यक्ष चंद्रकांत फुंदे उपस्थित होते. तटकरे यांनी राज्याचा सर्वांगीण आढावा घेऊन पुढील २५ वर्षांचे धोरण मांडले. ‘महाराष्ट्राच्या विकासाचे हे धोरण राबविण्यासाठी आम्हीच सत्तेत असू,’ असे त्यांनी जोरकसपणे सांगितले. ‘जागावाटपाबाबत महायुतीमध्ये सन्मानाने चर्चा सुरू असून जागावाटप लवकरच जाहीर होईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘महाराष्ट्राच्या विकासाचे धोरण राबविताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री की मुख्यमंत्री यांपैकी कोणत्या भूमिकेत असतील,’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘मित्र पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात नेतृत्वाचा विचार निकालानंतर होतो. अजितदादांनी नेतृत्व करावे, ही आमची इच्छा आहे. मात्र, आम्हाला पक्षाच्या मर्यादा माहीत आहेत. पुढील किमान पंधरा वर्षे मित्र पक्षांचे सरकार असेल. कोणाचीही एकहाती सत्ता येणार नाही. अशावेळी समान कार्यक्रमांवर भर द्यावा लागतो.’
‘लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चंद्र हातात आल्याचे विरोधकांना वाटू लागले होते; पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे तो चंद्र निसटला. व्यक्तिगत लाभाच्या अशा योजना सवंग लोकप्रियतेच्या वाटू शकतात. मात्र, वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा योजनांची गरज आहे. या योजनांमुळे पायाभूत विकासाच्या प्रकल्पांना खिळ बसणार नाही. राज्याचे उत्पन्न वाढत आहे. त्यातुलनेत कर्ज कमी आहे. शेतमालाची निर्यात सुरू झाल्यास शेतकरी सधन होईल,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Users Today : 9