चंद्रपूर : चंद्रपुरात वाघांचा वावर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याच्या घटनेला चोवीस तास झालेले नसताना बिबट्याने सात वर्षांच्या मुलाला ठार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहराजवळील सिनाळा येथील भावेश झारकर हा मुलगा गावाजवळ असलेल्या शाळेच्या परिसरात काल शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शौचायला गेला होता. त्याचदरम्यान बिबट्याने त्यावर हल्ला केला.वाघाच्या हल्ल्यात मूल तालुक्यात ठार झाल्याची घटना सतत घडत आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या अनुषंगाने अनेकदा वन विभागाला निवेदन देण्यात आले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे घटलेला घटनेला जबाबदार असलेल्या वनविभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिपुत्र ब्रिगेडच्याच्या वतीने डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी शुक्रवारी (२० सप्टेंबर) मूल पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनविभाग आणि पोलीस विभागाला संबंधित घटनेची माहिती देण्यात आली. वनविभागाच्या शोधमोहिमेत आज शनिवारी मुलाचे शिर सापडले. त्याच परिसरात मुलाच्या शरीराचे तुकडे देखील सापडले. सात वर्षाच्या मुलाची ही अवस्था बघून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.मूल तालुक्यात दोन महिन्यांमध्ये वाघाने पाच जणांचा बळी घेतला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. चिंचोली येथील देवाजी राऊत (वय ६४) यांचा गुरुवारी (दि. १९) वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यापूर्वी गणपत मराठे (वय ६०, केळझर), मुनिम गोलावार (वय ४१, चिंचाळा), वासुदेव पेंदोर (वय ६०, रा. मरेगाव), गुलाब वेळमे (वय ५२, रा. जानाळा) यांचा मृत्यू झाला आहे. बोरचांदलीचे विनोद बोलीवर हे जखमी झाले होते. बफर क्षेत्रात ११ वाघांचा संचार असल्याने नागरिक दहशतीत आहेत. वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मूल तालुक्यातील काही गावे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत.