मी महायुतीचाच उमेदवार असणार, पण…; आशिष जयस्वाल यांचं तळ्यातमळ्यात, पक्ष गुलदस्त्यात

Khozmaster
2 Min Read

नागपूर : विधानसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाकडून लढणार, याबाबत रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांची भूमिका तळ्यातमळ्यात असल्याचे परत एकदा दिसून येते.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाला समर्थन देणारे आशिष जयस्वाल सेनेतून बंडखोरी करून निवडून आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी अतिशय निकटचे संबंध असल्याचा दावा करून जयस्वाल म्हणाले, उभय नेते माझ्या हिताचा म्हणजे मतदारसंघाचा विचार करून निर्णय घेतील.

काय म्हणाले आशिष जयस्वाल?
‘मी शिवसैनिक आहे. रामटेकमधून लढणार आहे. मात्र, कुठल्या पक्षाकडून लढणार, याचे उत्तर लवकर मिळेल. सर्व पत्ते आताच उघडे करायचे नसतात, असे जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुढे ते असंही म्हणाले, ‘मी जरी अपक्ष निवडून आलो. तरी मी मुळातच शिवसैनिक होतो. आणि शिवसेनेचाच आमदार म्हणून मी मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी माझी चर्चा झालेली आहे. मी महायुतीचाच आमदार राहणार आहे. शेवटी निर्णय श्रेष्ठींचाच असेल. मी शिस्तीत काम करणारा माणूस, शेवटी वरिष्ठ ठरवतील तेच होणार. लवकरच याबाबत चांगली बातमी कळेल’, असं ते म्हणाले.
त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमात आले आहेत. युतीतील मित्रपक्ष भाजप व शिवसेनेत रामटेकवरून बरेचवेळा रस्सीखेच झाली. प्रत्येकवेळी आशिष जयस्वाल कुंपणावर असल्याची चर्चा रंगली होती. आताही त्यांनी पक्षाचे नाव घेतले नाही.

कोणत्या पक्षातून लढणार?
‘निवडून येण्याच्या क्षमतेच्या आधारे उमेदवार निश्चित केला जातो. मतदारसंघात माझे काम आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कामे केली. जनाधार, कार्यकर्त्यांची फळी आहे. सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक आमदार महत्त्वाचा असतो. कोणत्याही पक्षाकडून लढलो तरी, ऐतिहासिक मताधिक्य राहील’, असा दावाही आशिष जयस्वाल केला.

0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *