मुंबई :
राज्यभरात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणारी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरू होत असून यंदा राज्यातील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १४.५५ लाख विद्यार्थ्यांसाठी २०.४३ लाख जागा उपलब्ध आहेत. म्हणजेच एकूण पात्र विद्यार्थ्यांपेक्षा सुमारे सहा लाख जास्त जागा आहेत. मुंबई विभागाचा विचार करता मुंबई विभागातून ३.२१ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ४.६१ लाख जागा रिक्त आहेत.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने राज्यभरातील प्रवेश क्षमतेची माहिती प्रसिद्ध केली. या माहितीनुसार राज्यातील ९२८१ नोंदणी केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मिळून २० लाख ४३ हजार २५४ जागा अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यात सर्वाधिक म्हणजेच आठ लाख ५२ हजार २०६ जागा विज्ञान शाखेच्या आहेत. त्या खालोखाल कला शाखेसाठी सहा लाख ५० हजार ६८२ आणि वाणिज्य शाखेसाठी पाच लाख ४० हजार ३१२ जागा आहेत.
दहावीनंतर अनेक जण पॉलिटेक्निक आणि इतर अभ्यासक्रमांचीही निवड करत असल्याने आधीच पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा जास्त असलेल्या उपलब्ध जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात काहीच अडचण येणार नाही. मात्र उपलब्ध जागा जास्त असल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहण्याची भीती आता व्यक्त होत आहे.
विभागनिहाय उपलब्ध जागा –
| विभाग | उत्तीर्ण विद्यार्थी | कला | विज्ञान | वाणिज्य | एकूण |
| अमरावती | १,४७,७३९ | ८०,७४० | २४,३४० | ८१,३९५ | १,८६,४७५ |
| छ. संभाजीनगर | १,७०,७५० | १,११,१६५ | ४२,६१५ | १,१२,६७० | २,६६,७५० |
| कोल्हापूर | १,२५,३८० | ६४,५७२ | ४८,४६६ | ८०,२४० | १,९३,२७८ |
| लातूर | ९७,९९० | ५२,८६० | २१,२६० | ६३,४३० | १,३७,५५० |
| मुंबई | ३,२१,५६६ | २२,९५५ | २,७२,९३० | १,६०,७१५ | ४,६१,६४० |
| नागपूर | १,३२,६५० | ७६,३९५ | ३८,८३० | ९९,८७० | २,१४,३९५ |
| नाशिक | १,८३,३०५ | ८३,००० | ३७,०२० | ८६,७३० | २,०७,३२० |
| पुणे | २,४९,५०७ | १,०३,७०५ | १,०१,९७१ | १,७०,१७० | ३,७५,८४६ |
| ६,५०,६८२ | ५,४०,३१२ | ८,५२,२०६ | २०,४३,२५४ |
Users Today : 18