पावसाचा जोर कायम – राज्यातील पाच घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट

KHOZ MASTER
2 Min Read

पावसाचा जोर कायम – राज्यातील पाच घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

मुंबई, १७ जून २०२५ – भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुंबई उपनगरात सर्वाधिक ८३.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, ठाणे (७३.७ मिमी), मुंबई शहर (६२.९ मिमी), रायगड (५४.१ मिमी) आणि पालघर (४९.७ मिमी) या जिल्ह्यांतही पावसाचा जोर राहिला.

राज्यातील इतर ठिकाणी पावसाची स्थिती (१७ जून सकाळपर्यंत):

रत्नागिरी – ४७.७ मिमी, सिंधुदुर्ग – १२.७ मिमी, सातारा – १९.७ मिमी, कोल्हापूर – १७.८ मिमी, पुणे – ११.९ मिमी, तसेच इतर जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदी इशारा पातळीवर असून, प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील वळंजवडी (खेड, रत्नागिरी) येथे १०० मीटर क्षेत्रात रस्त्याला भेगा पडल्यामुळे वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता खचल्यामुळे वाहतूक बंद असून, दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवण्यात आली आहे.

मुंबई उपनगरात पाण्यात बुडून एक मृत्यू, मातीच्या ढिगाऱ्याखाली एकाचा मृत्यू. झाड पडून ३ जखमी, स्लॅब व भिंत पडून अनुक्रमे २+२ व्यक्ती जखमी.

यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू.

धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार जनावरांचा मृत्यू झाला आहे.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 9 7 3 8 5
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *