“तत्कालीन सरकारने दिलेल्या जखमांवर वर्तमान शासनाने मलम लावावे” – नारायण बागडे यांची मागणी
नागपूर :
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यातील भिमसैनिकांना योग्य सन्मान मिळावा व त्यांना पेन्शन लागू करावी, अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली आहे. ते इंदोरा येथील दहा नंबर पुलाजवळील शहीद भिमसैनिक स्मारकावर आयोजित कार्यक्रमात शहीदांना मानवंदना देताना बोलत होते.
बागडे म्हणाले की, “नामांतर आंदोलन हे एका समाजाचे नव्हते, तर लोकशाहीच्या हिताचे होते. सोळा वर्षांच्या संघर्षात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी लोकशाहीचा सन्मान राखला. तत्कालीन सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन दोन्ही सभागृहांत एकमताने ठराव पारित केला, मात्र अमलबजावणीची जबाबदारी समाजाच्या माथी मारली. त्यामुळे एक संपूर्ण पिढी होरपळली.”
“आता वर्तमान शासनाने त्या जखमांवर मलम लावावे, आणीबाणीच्या धरतीवर नामांतर लढ्यातील कार्यकर्त्यांना पेन्शन द्यावी,” अशी बागडे यांनी स्पष्ट मागणी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रमणी बांबुर्डे होते. यावेळी सुप्रसिद्ध इतिहासकार नामदेवराव निकोसे, ज्येष्ठ नेते दामुदादा कावरे, पँथर नेते अनिल मेश्राम, पुर्थी गोटे, चरणदास गायकवाड यांनीही आपले विचार मांडले.
डॉ. सुधा जनबांधू यांनी शहीद भिमसैनिक पोचीराम कांबळे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली तभाने, तर सूत्रसंचालन प्रा. रमेश दुपारे यांनी केले.
या कार्यक्रमात शालिक बांगर, राजू कांबळे, मनोहर इंगोले, रमेश डहका, सुशिला जनबांधे, रुबिना शेख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 4