प्रत्येक शेताला रस्ता मिळावा यासाठी सप्टेंबर अखेर धोरण जाहीर होणार – महसूल मंत्री बावनकुळे
मुंबई, ६ ऑगस्ट २०२५ :
राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळावा, ही राज्य शासनाची स्पष्ट भूमिका आहे. याच अनुषंगाने पाणंद रस्ते तयार करण्यासाठी गठित समितीच्या पहिल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या अनुषंगाने सप्टेंबर अखेरपर्यंत सर्वंकष धोरण तयार केले जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची पहिली बैठक मंत्रालयात पार पडली.
या बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, समितीचे सदस्य आमदार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शेतकऱ्यांना शेतीपर्यंत सहज पोहोचता यावे, उत्पादन खर्चात बचत व्हावी आणि शेतीचा विकास साधता यावा यासाठी पाणंद रस्त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
धोरण आखताना ग्रामपंचायत, महसूल, वन आणि अन्य विभागांमधील समन्वय साधण्यावरही भर दिला जाणार आहे.
Users Today : 22