साखरखेर्डा ;–
बुलढाणा येथून चालणाऱ्या महत्त्वाच्या बसफेरी बंद झाल्यामुळे परिसरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवासी संघटनेने आरोप केला आहे की, नवीन बसफेऱ्या सुरू करण्यासाठी वारंवार निवेदने दिल्यानंतरही बुलढाणा आगार व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, तर दुसरीकडे तब्बल ५० वर्षांपासून चालणाऱ्या बसफेरी बंद करण्याचा सपाटा लावला जात आहे.
बुलढाणा- वझर आघाव मार्गावरील बसफेरी गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. या सेवेद्वारे विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी आणि सामान्य प्रवासी तसेच पोस्ट व टपाल पार्सलची वाहतूक केली जात होती. बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत आहे आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
सकाळी ७ वाजता बुलढाणा येथून सुटणारी आणि दुपारी ४ वाजता किनगाव जट्टला जाणारी बस बंद झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मेरी, अंत्रीखेडेकर, मोठा मेरा, शिंदी, साखरखेर्डा, गोरेगाव, बाळसमुंद्र, शेंदुर्जन, आंबेवाडी, हनवतखेड, आगेफळ, झोटींगा, मलकापूर पांग्रा, मांडवा, बिबी या गावांतील नागरिक नियमित एस. टी. सेवा उपलब्ध नसल्याने खासगी वाहतूकदारांकडे अवलंबून आहेत.
प्रवासी संघटनेने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम जाधव, माजी सरपंच रविंद्र पाटील, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, शंकरराव उगलमुगले, बंद्री बोडखे, अनंता शेळके यांच्यासह दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, बस फेरी दोन दिवसांत पूर्ववत सुरू न केल्यास या मार्गावरील गावांमध्ये रस्तारोको आंदोलन केले जाईल.
संघटनेने बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली असून, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांबाबत प्रशासनाने योग्य ती दखल घेण्याचेही आवाहन केले आहे.
Users Today : 1