बुलढाणा, दि. ३ :
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी शासनाने ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ६८ हजार २७० महिला अपात्र ठरल्या असून, त्यांचा दरमहा १,५०० रुपयांचा लाभ बंद झाला आहे.
पात्र असूनही अपात्र ठरवल्या गेल्याने अनेक महिलांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे शासनाने आता पात्र-अपात्रतेची सत्यता पडताळणी करण्याचा निर्णय घेतला असून, ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, अतिरिक्त कामाच्या भारामुळे अनेक अंगणवाडी सेविकांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
अंगणवाडी सेविकांमध्ये कुजबुज : “आधीच कामांचा डोंगर, आणखी ओझे नको!”
गर्भवती महिलांचे लसीकरण, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषण आहार शिजविणे व वाटप, घरोघरी जाऊन मुलांना बोलावणे, रजिस्टर भरणे अशा अनेक जबाबदाऱ्या असताना पडताळणीचे अतिरिक्त काम नको, असा सूर सेविकांमध्ये आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संघटनेकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. उघड विरोध नसला तरी प्रत्येक गावात या कामाबाबत असंतोष असल्याचे चित्र आहे.
Users Today : 8