Chikhli –
चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना बोगस मका बियाण्यांमुळे मोठा आर्थिक फटका बसला असून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार Shweta Mahale यांनी राज्य विधिमंडळात औचित्याच्या मुद्याद्वारे केली. तसेच चिखली शहरातील Bombay Market Chikhli येथे लागलेल्या भीषण आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना कोणतीही शासकीय प्रक्रिया अडथळा न आणता तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आ. महाले यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, Eklara, Shirpur आणि Dhad येथील शेतकऱ्यांनी घेतलेल्या मका बियाण्यांमुळे उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. Bayer CropScience Limited कंपनीमार्फत बीज उत्पादन कार्यक्रमांतर्गत दिलेल्या बियाण्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी लागवड केली होती. कंपनीने प्रति एकर ४५ क्विंटल उत्पादन व प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र प्रत्यक्षात मका पिकाच्या कणसांमध्ये दाणेच भरले नसल्याने (सीड नॉन-सेटिंग) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल उत्पादनही मिळणे कठीण झाले आहे.
याशिवाय धाड येथील शेतकरी नितीन रघुनाथ बारोड यांनी Syngenta कंपनीच्या ६६६८ वाणाच्या मका बियाण्याची लागवड केली असता पिकाला कणसेच न लागल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली असली तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याकडे आ. महाले यांनी लक्ष वेधले.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे कंपन्यांना पाठीशी घालणे अजिबात सहन केले जाणार नाही. त्यामुळे संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि ती भरपाई कंपन्यांकडूनच वसूल करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, चिखली शहरातील बॉम्बे मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या व्यापाऱ्यांना शासनाने कोणताही जीआर किंवा प्रक्रियात्मक अडथळा न आणता तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही आ. श्वेता महाले यांनी केली.
Users Today : 11