शेतकरी श्रीनिवास नाफडे यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान
धामणगाव बडे –
Motala तालुक्यातील तळणी येथे गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून शेतातील हरभरा जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत शेतकरी Shrinivas Nafde यांचे सुमारे तीन एकर क्षेत्रातील हरभरा पूर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार, १९ मार्चच्या रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. याचदरम्यान नाफडे यांच्या शेतात सोंगणी करून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीवर अचानक वीज कोसळली. हरभरा सुका असल्यामुळे आगीने लगेचच पेट घेतला आणि काही वेळातच संपूर्ण ढिगारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
नाफडे यांनी पाच दिवसांपूर्वी मजूर लावून हरभऱ्याची सोंगणी पूर्ण केली होती. मळणी यंत्राद्वारे काढणी करण्यासाठी शेतात हरभऱ्याच्या गंजी रचून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र अचानक पडलेल्या विजेमुळे संपूर्ण उत्पादन जळून खाक झाले.
या आगीत केवळ हरभऱ्याचे उत्पादनच जळाले नाही, तर जनावरांसाठी वर्षभर लागणारा चारा (कुटार) देखील जळून नष्ट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढवले आहे.
दरम्यान, परिसरातील इतर शेतकऱ्यांचेही गहू व मका पिके वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा आणि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकरी श्रीनिवास नाफडे यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Users Today : 15