मलकापूर –
Malkapur तालुक्यात १९ मार्च रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे Vitāli शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री सुमारे ९ ते १० वाजेच्या दरम्यान झालेल्या या पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे बहारात आलेला मका, ज्वारी तसेच इतर पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली.
विशेषतः कापणीच्या उंबरठ्यावर असलेल्या मका व ज्वारी पिकांवर या अवकाळी पावसाने मोठा घाला घातला आहे. जोरदार वाऱ्यामुळे उभे पीक आडवे पडले असून अनेक ठिकाणी कणसे व दाणे मातीमध्ये मिसळले आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर या नुकसानीमुळे नवे संकट उभे ठाकले आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत झालेला खर्च, मजुरी तसेच खत-औषधांवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाचे सर्वेक्षण करावे, अशीही मागणी होत आहे.
याबाबत Santosh Verulkar म्हणाले,
“आमचं सगळं पीक कापणीला आलं होतं. एका तासाच्या पावसाने सगळं काही विखुरलं. वर्षभराची मेहनत मातीमोल झाली. आता कर्ज कसं फेडायचं आणि पुढचं पीक कसं घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे. शासनाने तातडीने मदत केली नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होईल.”
Users Today : 15