आंध्रप्रदेशात भेसळयुक्त दूध पिल्यामुळे तब्बल १६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आणखी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही घटना आंध्रप्रदेश मधील गोदावरी जिल्हा येथे घडली आहे. लालाचेरुवु, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर या भागांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून एका डेअरीमधून भेसळयुक्त दूध विकले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
लोकांना अचानक त्रास सुरू
फेब्रुवारी महिन्यापासून या भागातील नागरिकांना दूध पिल्यानंतर अचानक मळमळ, उलटी, पोटदुखी, लघवी बंद होणे आणि मूत्रपिंड निकामी होणे अशा गंभीर तक्रारी जाणवू लागल्या. सुरुवातीला २२ फेब्रुवारी रोजी काही लोक आजारी पडल्याच्या घटना समोर आल्या.
नंतर सखोल तपास करण्यात आला असता दूधामध्ये एथिलीन ग्लायकॉल हा विषारी रासायनिक पदार्थ मिसळला जात असल्याचे उघड झाले. हा पदार्थ शरीरासाठी अत्यंत घातक असून तो मूत्रपिंडांवर थेट परिणाम करतो.
२० पेक्षा जास्त जण रुग्णालयात
या विषारी दुधामुळे २० पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यामध्ये लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
डेअरीवर संशय, चौकशी सुरू
तपासात समोर आले की हे दूध नरसापूरम येथील एका डेअरीमधून पुरवले जात होते. या डेअरीमधून १०० पेक्षा जास्त कुटुंबांना दूध वितरित केले जात होते. दूध पिल्यानंतर काही तासांतच लोकांची प्रकृती बिघडत होती.
अनेक रुग्णांना डायलॅसिस आणि व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले असून काहीजण अजूनही आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भेसळ करून लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या डेअरी मालकावर कठोर कारवाई करावी आणि आरोपींना कडक शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
Users Today : 2