समता शिक्षक परिषदेच्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर आज समाज अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. कधी नव्हे तेवढी आज लोकशाही धोक्यात आलेली आहे. धर्माधिष्ठित विचार समाजाला अत्यंत चुकीच्या दिशेने नेत आहेत. याचे संपूर्ण सावट देशाच्या भविष्यावर आहे. राजकारणी, एकांगी चळवळी, एकांगी संघटना व अतिरेकी विचार यांच्यामुळे भारतीय लोकशाही व संविधान संकटात सापडले असून आज संविधान संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदे मार्फत आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. आज देशाला शिक्षकच वाचवू शकतो. म्हणून शिक्षकांनी माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या विचारांना रोखण्यासाठी तयार राहिले पाहिजे. समता शिक्षक परिषद हे फुले- शाहू -आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या समतेवर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी चालविलेले मिशन आहे. वैचारिक मंथन घडवून आणणे आणि बुद्धाचा प्रेम हा विचार घेऊन क्रांती प्रस्थापित करणे असा उदात्त हेतू या संघटनेचा आहे. शिक्षण क्षेत्राला अशाच प्रेमाच्या आणि समतेच्या विचाराची गरज आहे, असे सुद्धा डॉक्टर सबनीस यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात नमूद केले.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा साहेब डी. के. अहिरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर डी. बी. साळुंखे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर चंद्रकांत साळुंखे, बुलढाणा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता धम्मरत्न वायवाळ, संघटनेचे प्राथमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ, अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. संघटनेच्या समता विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. प्रा. शशीकांत बारी लिखित ‘तान्हूले तू आलीस खरी…’ व वर्षा अहिरराव लिखित निबंध वर्षा आणि पोएट्री अँड पोयटिक डिव्हाइसेस इत्यादी पुस्तकांचे प्रकाशान डॉक्टर श्रीपाल सबनीस व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.सत्यशोधक चळवळ 150 व्या वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे यावर्षी सत्यशोधक पुरस्काराचे वितरण संघटनेमार्फत करण्यात आले. *सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार यांना क्रांतीसुर्य तात्यासाहेब ज्योतीराव फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे यांना प्रभावती बावस्कर यांचे स्मरणार्थ सावित्रीमाई फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.* कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर डॉक्टर अनिल झोपे अरविंद खैरनार व निवेदिता ताठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या राज्य अधिवेशना संदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ यांनी मांडली. पुरस्कारार्थी शिक्षकांमधून डॉक्टर अतुल सूर्यवंशी, प्राध्यापक शशिकांत बारी व लक्ष्मण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समता विशेषांका मागील भूमिका समता शिक्षक परिषदेचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षा मनीषा देशमुख यांनी केले. संपूर्ण सत्रातील विविध कार्यक्रमाचे संचलन अश्विनी कोळी, रंजना इंगळे, भारती ठाकरे, शंकर भामेरे, टी.बी. पांढरे, गणेश बच्छाव यांनी केले. जिल्हास्तरावरील 28 व राज्यस्तरावरील सहा गुणवंत शिक्षक पुरस्कारांचा प्रदान सोहळा यावेळी संपन्न झाला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत शिस्तमय वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक यावेळेस उपस्थित होते.
Users Today : 38