मूर्तिजापूर – शासन स्तरावरून सन २०१४ मध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत हागनदारी मुक्त करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर स्वच्छता अभियान व हागणदारी मुक्त योजना दंडात्मक कारवाईचा बडगा मिरवत राबविण्यात आली होती.
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे व पुरातन चालत आलेल्या टमरेट घेऊन जाणाऱ्या परंपरेवर पडदा पडावा यासाठी कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करून शौचालय बांधकाम करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले होते.अशातच ग्रामपंचायत स्तरावरून निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना बारा हजार रुपये अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्यात आले होते त्यात शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे बांधकाम लाभार्थ्यांने आपल्याला शक्य होईल त्या जागेत बांधकाम करणे गरजेचे होते परंतु तालुक्यात याउलट झाल्याचे दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्था व तालुकास्तरावरील प्रशासन अशी यंत्रणेची सांगळ घालून हुकूमशाही पध्दतीचा वापर करून ठराविक ठेकेदाराकडून शौचालयाचे बांधकाम करण्यास व अनुदानाची रक्कम संबंधित ठेकेदाराला देण्यास भाग पाडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हयामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे व शौचालयाचे बांधकाम एकदम निष्कृष्ट दर्जाचे करून दिल्याचा आरोप संबंधित लाभार्थी करीत आहेत.कदाचित एखाद्या वेळेस जोराचा वारा सुटला तर शौचास गेलेल्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी असणारी परिस्थिती असल्याचे बोलल्या जात आहे.अशा परिस्थितीत संबंधित यंत्रणेवर विश्वास करत गावागावात १००% हागणदारी मुक्त गाव असल्याचे नामफलक लावून उदो उदो करण्यात आला आहे.परंतु वास्तव बघितले तर पुर्वी असलेली परिस्थिती कायम असल्याचे दिसत आहे.यामुळे सदर योजना ह्या नावापुरत्याच राबविल्या गेल्या असल्याच्या चर्चेला जनसामान्यांत ऊत आल्याचे चित्र दिसत आहे.
यावर स्थानिक प्रशासन, तालुका प्रशासन काय उपाययोजना करतील. याकडे सर्वांचे लक्ष असून नुसता कागदोपत्री हागणदारी मुक्त धोरणाबाबत दिशाभूल करणाऱ्या यंत्रणेवर आळा घालण्याची मागणी जोर धरत आहे.
Users Today : 22