प्रविण चव्हाण
नंदुरबार -: खरीप हंगामा मध्ये शेतकरी अनेक वेळा स्वतः कडील बियाणे वापरतात. परंतु, सदर बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करणे गरजेचे आहे.
यामुळे शेतकऱ्यांची बियाणे उगवण बाबत होणारी फसवणूक टाळता येऊ शकल्याचे मत कृषी सहाय्यक मनोहर सैंदाणे यांनी व्यक्त केले. ते मुबारकपूर येथे खरीप हंगाम पूर्वतयारी म्हणून सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी बियाणे उगवन तपासणी प्रात्याक्षिक कार्यक्रमात बोलत होते.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने मुबारकपूर येथे खरीप हंगाम पूर्वतयारी म्हणून सोयाबीन मूग, उडीद, ज्वारी बियाणे उगवन तपासणी प्रात्यक्षिक करण्यात आले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन, तसेच ग्राम स्तरावर हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सरपंच भारत अहेर, माजी सरपंच देवा पवार, ग्रा.पं.सदस्य सागर अहेर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश अहेर, चेतनसिंग अहेर, गोपाल पवार, सुदाम पवार, आकाश अहेर, राहुल अहेर, दिनेश अहेर, विठ्ठल अहेर, नवल अहेर, राहुल रावताळे, सुदाम अहेर, महेश अहेर, प्रितम अहेर आदीसह शेतकरी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गावोगावी असे प्रशिक्षण आयोजित केले जात आहेत. प्रात्यक्षिक नमुना-माल साठवून ठेवण्यासाठी असलेले पोत्याचे चौकोनी तुकडे करून, ते ओले करून त्यावर शंभर दाणे मोजून ते दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर दहा-दहाच्या रांगेमध्ये ठेवावेत, त्यावर हलकेसे पाणी शिंपडावे व त्याची गुंडाळी करून सावलीत ठेवावे, एक-दोन दिवसानंतर अधून-मधून त्या गोणपाटावर पाणी मारावे, सहा ते सात दिवसानंतर शंभर पैकी ७० बियाणे उगवन झालेले असतील, तर ते बियाणे पेरणी योग्य समजून पेरणीसाठी वापरावे, या बियाणे उगवण क्षमता चाचणीमुळे शेतकऱ्यांचे बियाणे उगवणी बाबत खात्री होते व बियाणे न उगवण्याचा व पेरणी खर्च वाचतो. ज्या बियाण्याची उगवण क्षमता चाचणी झालेली आहे. असे बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून पेरणी केल्यास उगवण क्षमता चांगली होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के निश्चित वाढ होते. शेतकऱ्यांनी कमी खर्चाचे अशी उपाययोजना करून होणारे नुकसान टाळाण्याचे आवाहन कृषी विभागाचे कृषी सहाय्यक मनोहर सैंदाणे यांनी केले.
Users Today : 18