MPSC च्या निकालात गडचिरोलीचा डंका, शैक्षणिक मागासलेपणाची ओळख मिटणार, तब्बल १३ विद्यार्थ्यांनी मारली बाजीनक्षल्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात अजूनही मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नाही. त्या भागातील यंदा तब्बल १३ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत बाजी मारत पशुधन विकास अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असून शिक्षणात गडचिरोली जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख या शिलेदारांनी पुसून काढत या शिलेदारांनी इतिहास रचला आहे.
जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील ६,वडसा तालुक्यातील ३,गडचिरोली तालुक्यातील २,चामोर्शी तालुक्यातील १ आणि अहेरी तालुक्यातील १ असे ४ मुली आणि ९ मुले एकूण १३ जणांचा समावेश आहे.या सर्वांनी २२ डिसेंबर २०२२ मध्ये एमपीएससी परीक्षा दिली.५ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखत झाली आणि त्याचा निकाल २० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास जाहीर झाला.त्यात तब्बल १३ जणांना यात घवघवित यश मिळालं.आता हे सर्व तरुण तरुणी विविध ठिकाणी पशुधन विकास अधिकारी म्हणून सेवा देणार आहे.स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील गडचिरोली जिल्ह्यातील बराचसा भाग मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. नक्षल्यांची दहशत आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हा जिल्हा आजही मागास आहे. परिणामी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतो. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि सोयी सुविधांचा अभाव यामुळे बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात समोर जातात.
गडचिरोलीत जिथे नीट रस्ते नाही, अनेक गावांत आजही लाईन पोहोचलेली नाही. नेटवर्कचा पत्ता नाही,संपूर्ण भाग नक्षल्यांच्या दहशतीत जगणारा मात्र मेट्रो सिटीच्या तुलनेने याच गडचिरोलीने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली असून जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.गडचिरोली जिल्ह्यातील खूप कमी विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात तर बोटावर मोजण्यासारखे विध्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करतात.पूर्वी वनरक्षक, शिक्षक,ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य सेवक,कनिष्ठ लिपिक किंव्हा पोलीस शिपाई केवळ इथपर्यंतच विद्यार्थ्यांनी मजल मारायची.पण आता मागील काही वर्षांपासून दरवर्षी जिल्ह्यातील एक-दोन विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होताना दिसत आहेत.यावेळी मात्र,एकाचवेळी तब्बल १३ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा पास करत राजपत्रित अधिकारी झाले आहेत.गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब असून क्लास वन अधिकारी म्हणून निवड झालेल्या शिलेदारांमुळे भावी पिढीला नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.
Users Today : 11