कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा आत्ताच महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. साताऱ्याचे खासदार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. अजित पवार यांनी काल सातारा लोकसभेच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्याचा विचार आम्ही करतो आहोत. मात्र, साताऱ्याच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र बसून निर्णय घेतील. आता आमचा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस चा योग्य पद्धतीने सुखाचा संसार सुरू झाला आहे. २०२४ ला लोकसभेतल्या ४५ जागा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या २०० जागा आम्ही जिंकू असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सहपरिवार श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे आणि दख्खनचा राजा ज्योतिबाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी हिवाळी अधिवेशन येत्या सात तारखेपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात आम्ही राज्यातील महत्त्वाचा विषय असलेला मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यांच्यावर सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे. सध्या समाजामध्ये काही समज गैरसमज निर्माण झाले आहेत. कोणाचं तरी आरक्षण काढून कोणाला तरी दिलं जाईल, असं अनेकांना वाटतं मात्र ही भूमिका राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाही.कोणाचंही काढून न घेता कायदेशीर दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल या संदर्भात सरकार प्रयत्न करत आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
सरकार जाणीवपूर्वक कठोरपणे कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही :गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलन पेटलं असून यासंदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने मला अटक करण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाज काय आहे हे दाखवून देऊ असा इशारा दिला आहे. मात्र आंदोलनात दगडफेक,जाळपोळ,पोलिसांवर हल्ले झाले तर वेगवेगळ्या नियमानुसार कारवाई होत असते. सरकार जाणीवपूर्वक कठोरपणे कारवाई करण्याच्या मनस्थितीत नसतं. मात्र दोन्ही समाजाने सलोखा आणि संयम बाळगावा. या आधी लाखोच्या संख्येने मराठा मोर्चा निघाले मात्र एक टाचणी खाली पडली नाही. इतक्या शांततेत आंदोलन करायची मराठा समाजाची ख्याती आहे, असं देसाई म्हणाले.मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास आहे हे त्यांनी स्वतः सांगितला आहे. यामुळे जरांगे पाटलांनी संयम बाळगावा, अशी विनंती शंभूराज देसाई यांनी केली आहे. तसेच आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केले असून या हल्ल्याबाबत अद्याप मला कोणतीही माहिती नाही. मात्र, मागणी करत असताना सनदशीर मार्गानेच करावी, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असेही देसाई यावेळी म्हणाले आहेत.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी २०२४ ला महायुतीचा विदूषक होणार आहे, असा आरोप महायुतीवर केला होता. याला शंभूराजे देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून २०२४ च्या निवडणुकीत वडेट्टीवार यांनी त्यांचा पक्ष कितव्या नंबरला असणार आहे याचा विचार करावा. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तुमचा पक्ष कितव्या नंबरला गेला आहे. याची त्यांनी आकडेवारी काढून पाहावी. त्यांच्याकडे सध्या विरोधी पक्षनेते पद आहे, त्यामुळे ते असे बोलत आहेत. मात्र त्यांनी आम्हाला जो शब्द प्रयोग केला आहे तशी अवस्था त्यांची २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर होईल असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
Users Today : 18