भाजप आरक्षणविरोधी आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्याने केंद्राकडे जाऊन आरक्षणमर्यादा पन्नास टक्क्यांवर वाढविणे आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटता ठेवून राजकीय पोळी शेकायची आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी आज येथे केला. सोबतच लोकसभेपूर्वी हा संघर्ष आणखी तीव्र होईल, अशी भीतीही व्यक्त केली.
युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने ते सोमवारी (ता. चार) अमरावतीत आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रोहित पाटील, शहराध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, विनीत आडतिया, गणेश राय व संगीता ठाकरे उपस्थित होत्या. आमदार रोहित पवार म्हणाले, चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम पडणार नाही. उलट दक्षिणेत मिळालेल्या यशाचा महाविकास आघाडीला फायदाच होणार आहे. मध्य प्रदेशातील निकालांनी शिंदेंचे अस्तित्व धोक्यात आणले आहे.
भाजप मित्रासोबत पुढे काय करतो हे महाराष्ट्राने अनुभवले आहे.तेच शिंदेंसोबत होणार आहे. राज्यातील वारकरी संप्रदाय संपविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, उत्तर व मध्य राज्यांमधील भागवत संप्रदायाचे प्रस्थ वाढविण्यात येत आहे. मात्र सशक्त असलेला वारकरी संप्रदाय संपणारा नाही.खरी राष्ट्रवादी कुणाची, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.पक्ष शरद पवार यांच्याकडे असून बाकी सत्तेत सहभागी झालेले मित्र आहेत, असा टोला त्यांनी अजित पवार यांना नाव न घेता लगावला. निवडणूक आयोगाला एकतर्फी निकाल देता येणार नाही.
कर्जत येथील अजित पवारांच्या विधानाबद्दल बोलताना ते म्हणाले, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचा सल्ला दिला असता तर ते स्वतः का गेले नाहीत. अजितदादांच्या कानाला कोण लागले आहेत, हे राज्याला माहित आहे. संघर्ष यात्रेदरम्यान आपण ग्रामीण रुग्णालयांना भेटी देत पाहणी केली आहे. या रुग्णालयांमध्ये औषधी नाहीत, हे काल नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयातही दिसून आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Latest Marathi News)
आज आक्रोश मोर्चा
मंगळवारी (ता. पाच) अमरावतीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती देताना आपण स्वतः या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही
संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विविध जिल्ह्यातील नागरिकांसोबत संवाद साधता येत असून अनेक समस्या समोर आल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. पीकविम्याची परतावा मिळालेला नाही. इतकेच काय तर अग्रिमही मिळालेला नाही. राज्य सरकारमधील पालकमंत्र्यांचा प्रशासनासोबत संवाद नाही, चर्चा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.हिवाळी अधिवेशनात या सर्व मुद्द्यांसह युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यावर सरकारला जाब विचारणार आहे. (Latest Marathi News)
Users Today : 19