पूर येवो अथवा शेतकरी आत्महत्या करो. महायुती सरकारला काहीही देणेघेणे नसून या सरकारचे नागपूरचे अधिवेशन शेवटचे ठरणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे महायुतीचे नेते वारंवार सांगतात. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही होत नाही. नागपूरला मोठा पूर आला. हजारो घरांमध्ये पाणी शिरले. लाखोंचे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री नागपूरचे असतानाही कोणालाही मदत देण्यात आलेली नाही.
रोजगार देण्याच्या नुसत्या बाता केल्या जात आहेत. नागपूरमधील मिहानचा फक्त डोलारा उभा आहे. कोट्यवधीचे एमओयू केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर एकाही कंपनीचे काम सुरू होत नाही. हजारो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले जात आहे.
युवकांना रोजगार मिळत नाही. मात्र सरकारच्या बगलबच्चांना काम मिळते असा आरोप नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना पटोले यांनी केला.
ही सरकारची हिटलरशाहीच
मागासवर्गीय आयोग हा संवैधानिक आहे. त्याला संविधानाच्या चाकोरीतून जावे लागते. मग सरकार जर खोटे प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव आणत असेल तर ते तसे करू शकत नाही म्हणून दोन सदस्यांनी राजीनामा दिला असावा.
मागासवर्गीय आयोगाचे सदस्य जर राजीनामा देत असेल तर या सरकारची ती हिटलरशाही आहे. हे सरकार दोन जातीमध्ये वाद निर्माण करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारने लावलेला हा वनवा आहे. यांना ओबीसी किंवा मराठा यांच्याशी देणे घेणे नाही. फक्त वाद निर्माण करून राज्य बरबाद करायचे असल्याचे पटोले म्हणाले.
Users Today : 20