वाळवा : आरक्षणाच्या मागणीसाठी आज धनगर समाजातर्फे आष्टा येथील अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे..’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. मोर्चात शेळ्या-मेंढ्यांसह धनगर बांधव उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा निघाला. यावेळी अप्पर तहसीलदार धनश्री भांबुरे यांना समाजातर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्य घटनेमध्ये धनगर समाजाचे अनुसूचित जमातीत आरक्षण असूनही गेली ७० वर्षे राज्यात व केंद्रात कोणतेही सरकार असो, त्यांनी समाजास झुलवत ठेवले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
हा फार मोठा अन्याय धनगर समाजावर झाला आहे. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा वापर करून घेतला आहे. पुढारी निवडणुका तोंडावर आल्या की, आरक्षण देतो, असे नेहमीच वचन देत आले आहेत;मात्र धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केला आहे. हा अन्याय आता समाज सहन करणार नाही. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणाची अंमलबजावणी लवकर करण्यात यावी, यासाठी आवश्यक बाबी व कागदपत्रांची पूर्तता राज्य सरकारने केंद्राकडे तत्काळ करावी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरित निधी वितरण करावे. राजे यशवंतराव होळकर घरकुल योजनेसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून त्याचे वितरण व्हावे. राज्य शासनाने धनगर समाजासाठी घोषणा केलेल्या निधीची अंमलबजावणी करावी. समाजाने तरतूद प्रश्नावर केलेल्या वेळोवेळी आंदोलनावेळी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत.
आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बिरू खर्जे याच्या कुटुंबीयांना २५ लाख तत्काळ मदत द्यावी. मेंढपाळासाठी चराऊ राखीव कुरण उपलब्ध व्हावे. मेंढपाळावर हल्ला करणाऱ्यावर तत्काळ गुन्हे दाखल व्हावेत. तसेच जीवघेणे हल्ले थांबले पाहिजेत.
वन्य व मोकाट प्राण्यांपासून झालेल्या हल्ल्यात तत्काळ पंचनामा करून मेंढपाळांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी. रांजणी येथील शेळी-मेंढी महामंडळाच्या जागेवर धनगर समाजाच्या उन्नतीखेरीज अन्य कोणताही शासकीय प्रकल्प उभा करण्यासाठी परवानगी देऊ नये, अशा मागण्या या निवेदनात करण्यातआल्या आहेत.
Users Today : 20