नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये हजेरी लावली आहे. नवाब मलिक यांची वैद्यकीय जामिनावर सुटका झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटासोबत असणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, नवाब मलिक यांनी देखील आतापर्यंत भूमिका स्पष्ट केली नव्हती. आज नवाब मलिक विधान भवन परिसरात आल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गेले. ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या कक्षात बसले होते.
मी राष्ट्रवादी मध्येच, नवाब मलिक यांची भूमिका
मी राष्ट्रवादी मध्ये आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अधिवेशनाच्याकाळात विधानभवनात राजकीय मुद्द्यावर बोलणार नाही. माझ्या मतदार संघाच्या समस्या सभागृहात मांडणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले. आमच्यात कोणतीही फाटाफूट नाही आम्ही एकच आहोत, असे आमदार नवाब मलिक म्हणाले. ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसले होते.नवाब मलिक यांना विधानसभेतील सत्ताधारी बाकांवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले होते.
विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन आक्रमक
राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवरुन विरोधी पक्ष विधिमंडळाच्या आवारात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवन परिसरात आंदोलन करण्यात आलं. नेत्यांनी गळ्यात संत्री, वांगी याची माळ घालून आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर, शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चारसो बीस, विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकरी झाला कंगाल अशा घोषणा विरोधकांनी केल्या आहेत.विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, सुनील प्रभू , नाना पटोले, अनिल देशमुख, अभिजित वंजारी, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकर, अशोक चव्हाण आदींद्वारे विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, पीकविमा मिळावा यासाठी विरोधी पक्षाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं.
Users Today : 12