पक्षश्रेष्ठींनी संजय राऊतांना बळीचा बकरा बनवलं; नीलम गोऱ्हेंचा घणाघात, म्हणाल्या…

Khozmaster
2 Min Read

नागपूर : ‘शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी पडल्यानंतर पक्षात काय सुरू आहे, हे कळत नव्हते. आमदारांना निधीही दिला जात नव्हता. पक्षश्रेष्ठींना जे हवे होते, ते संजय राऊत यांच्याकडून बोलून घेत होते. राऊत टोकाची भूमिका घेतात, त्यावर मी आक्षेपही नोंदविला होता. आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीनेही मांडता येतात. मात्र, या प्रकरणात संजय राऊत यांना बळीचा बकरा बनविल्याचे लक्षात आले’, असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या (शिंदे गट) नीलम गोऱ्हे यांनी केले.सिव्हिल लाइन येथील प्रेस क्लब येथे विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधत राजकीय प्रश्नांनाही उत्तरे दिली. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी उपस्थित होते.

‘एकनाथ शिंदे यांना नगरविकास विभागाचे काम करू दिले जात नव्हते. करोनाकाळात शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. पक्षातील सगळेच कामात गुंतले असल्याने कोण कोणाला डावलत आहे, हे कळत नव्हते. मात्र, करोना कमी झाल्यानंतर या सर्व बाबी जाणवायला लागल्या. उद्धव ठाकरे आजारी पडल्यानंतर याची तीव्रता अधिक जाणवली. संजय राऊत यांच्याबद्दल आदर होता, मात्र ते टोकाची भूमिका घेत होते’, असे गोऱ्हे म्हणाल्या.‘कालांतराने पक्षाची कार्यपद्धती बदलली. नेत्यांना अपमानित केले जात होते. मतभेद मान्य करण्याचा भागच नव्हता. पारदर्शिपणाचाही अभाव दिसून येत होता. साहेब म्हणतील त्याला हो म्हणायचे ही पक्षाची शिस्त होती. सुरुवातीला यात काही चुकीचेही वाटले नाही. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल चांगल्या भावना आहेत. मात्र, जनाधार असलेल्या नेत्यांना डावलले जात होते, हे लक्षात आल्यानंतर ते खटकायला लागले. शिंदे नाराज आहेत, याची कल्पना होतीच’, असेही गोऱ्हे म्हणाल्या.महिला झाल्या सजग

‘मोठ्या शहरांमध्ये येणारे लोंढे ही मोठी समस्या आहेच. यामागे आर्थिक, सामाजिक अशी कारणे आहेत. अल्पवयीन मुलांना चुकीच्या व्यवसायात ढकलणारे रॅकेट सक्रिय आहेत. हे सगळे थांबविण्यासाठी पोलिस प्रशासन कमी पडत आहे. अन्य संस्थांमध्येही काहीशी अनास्था दिसते’, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. ‘पूर्वी महिलांवर होणाऱ्या अन्यायाला गांभीर्याने घेतले जात नव्हते. मात्र, आता महिला आपल्या हक्कासाठी सजग होत आहेत. अडचणीत असणाऱ्या महिलांसाठी भरोसा सेल आणि ११२ क्रमांक महत्त्वाचे ठरत आहेत’, असे गोऱ्हे म्हणाल्या.

0 9 3 8 2 4
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *