छत्रपती संभाजीनगर: शाळास्तरावरील सखी सावित्री समिती गट स्थापन करण्याच्या राज्यशासनाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत असून याद्वारे वर्षभरात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ६९९ बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे आहे. राज्यभरात हा आकडा १८०० पर्यंत पोहोचला आहे.शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या या समित्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची सुरक्षा, बालविवाह रोखणे, विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण, त्यांचे समुपदेशन करणे हा आहे. शिक्षण, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास, पंचायत, आरोग्य विभाग युनिसेफ, एसबीसीच्या सहकार्याने यावर काम केले जात आहे. यासाठी शाळा, केंद्र, तालुकास्तरावर समिती आहेत. यासह जिल्हा कृती आराखडा समितीचे नियंत्रण असते. शाळास्तरावरील समितीचे कामकाज पाहण्यासाठी, आढावा घेण्यासाठी युनिसेफचे एक पथक शुक्रवारी, आठ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आहे. शाळास्तरावर बालविवाह रोखण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जनजागृती-मार्गदर्शनपर सूचना फलक, चाइल्ड हेल्पलाइन आदींचा आढावा पथकाने घेतला. शाळांमध्ये जनजागृतीपर संदेश, कायद्यांची माहिती, प्रथमदर्शनी सूचनाफलकावर चाइल्ड हेल्पलाइन नंबर १०९८ प्रकाशित करण्यात आला की नाही, याची पाहणी करण्यात आली. यासह बालविवाहबद्दल विद्यार्थी, पालकांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. बालविवाहबाबत चाइल्ड हेल्पलाइनला फोन आल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दामिनी पथकाच्या मदतीने हे बालविवाह रोखले जातात. मराठवाड्यात आठ जिल्ह्यात जानेवारी ते आजपर्यंत ६९९ बालविवाह रोखण्यात आले आहेत. तर १२ जिल्ह्यात ८७३ बालविवाह रोखण्यात आले.१२ जिल्ह्यांमध्ये बीडमध्ये ४२ टक्के प्रमाण
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात बालविवाहाचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यात राज्यातील १२ जिल्हे आहेत. ज्यात मराठवाड्यातील सर्व ८ जिल्हे येतात. त्यात बीडचा वरचा क्रमांक लागतो. जिल्ह्याचे प्रमाण ४१.५ टक्के असे सर्वाधिक आहे. इतर जिल्ह्यात हे प्रमाण ३५ टक्क आहे. त्यामुळे यंत्रणेने सर्वाधिक लक्ष मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दिले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह सोलापूर, नाशिक, धुळे आणि जळगाव अशा बारा जिल्ह्यांत बालविवाह रोखण्यासाठी अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.या कारणांवर चर्चा
बालविवाहाचे प्रमाण मराठवाड्यात अधिक आहे. त्याचे कारण स्थलांतर, आर्थिकस्थिती अशी अनेक कारणे आहेत. याबाबत समितीच्या माध्यमातून शाळास्तरावर जनजागृती करण्यात येते. बालविवाहाचे दुष्परिणाम, माणसिक, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक काय परिणाम आहेत, याची माहिती, मार्गदर्शन जनजागृतीपर कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालकांना दिले जातात. वर्षभरात बालविवाह रोखण्यासाठीच्या प्रयत्नात मराठवाड्यातील ७ लाख ९ हजार २४९ पालक, नारिकांनी सहभाग घेतला. तर बारा जिल्ह्यात १२ लाख १४ हजार ६६ पालकांनी सहभाग घेतला.मराठवाड्यातील स्थिती..
जिल्हा…. रोखलेले बालविवाह
बीड.. २५३
परभणी.. १७२
लातूर.. ८२
छत्रपती संभाजीनगर ३५
जालना.. ५३
धाराशीव ३१
हिंगोली.. २९
नांदेड.. ४३
शहराच्या तुलनेत ग्रामीणस्तरावर बालविवाह रोखणे आव्हानात्मक आहे. सर्व यंत्रणा विविध पातळीवरुन प्रयत्न करते. बालविवाहाचे प्रमाण वाढण्यामागे स्थलांतरासह अनेक कारणे आहेत. जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्नाला मोठे यश येताना दिसते आहे. बालविवाह रोखण्याच्या प्रक्रियेत गाव पातळीवर शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.-पूनम कश्यप, बाल संरक्षण अधिकारी, युनिसेफ.