राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना थेट भिडावे. जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कठोर परिश्रम घ्या. जनतेच्या प्रश्नांना भिडल्यावरच पक्ष संघटना मजबूत होईल, असे आवाहन केले. काल कोल्हापुरात मार्केट यार्डमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते.
या बैठकीत तालुकानिहाय निधी वाटप, विविध शासकीय व अशासकीय समित्यांचे पदवाटप, विशेष कार्यकारी म्हणजेच ऑनररी मॅजिस्ट्रेट पदांचे वाटप व पक्ष संघटनेतील रिक्त पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका बाबत चर्चा झाली.
समाजात जनतेचे प्रश्न शंभर टक्के कधीच संपलेले नसतात. जनता दरबारसारख्या उपक्रमाच्या निमित्ताने जनतेच्या प्रश्नांना चांगले व्यासपीठ मिळालेले आहे. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घ्या. ज्यांचे प्रश्न अडीअडचणी असतील, त्या जनता दरबारात आणा. जे प्रश्न लगेच संपण्यासारखे आहेत ते एक महिनाभरातच सुटतील. जे प्रश्न अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुटणार नसतील, त्याला ते लेखी उत्तरे देतील. त्या संदर्भात न्यायालयात जाता येईल. तसेच; जे प्रश्न पुणे, मुंबई पातळीवरचे आहेत, ते मी स्वतः घेऊन जाईन आणि सोडवून.
तालुकानिहाय महिला अध्यक्षांची नावे तात्काळ द्या. ऑनररी मॅजिस्ट्रेट पदांसाठीची नावे आलेली आहेत. लवकरच ती जाहीर होतील. विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही नावे लवकरच निश्चित होतील. तसेच; पक्ष संघटनेतील विविध सेलमधील रिक्त पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका तातडीने केल्या जातील. शेंडा पार्कमध्ये एक हजार कोटीहून अधिक निधीतून लवकरच ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल असे अकराशे बेडचे देशात सर्वांगसुंदर हॉस्पिटल तयार होत आहे. येत्या महिनाभरात केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे भूमिपूजन होईल. तसेच; केडीसीसी बँकेच्या विस्तारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि सहकार परिषद होईल. त्याच दिवशी रात्री दोन लाख लोकांच्या उपस्थितीत लोकसभा प्रचार शुभारंभाची सभाही होईल.
येत्या २२ तारखेला सबंध भारतभर अयोध्येमधील प्रभू श्री. राम मंदिर वास्तुशांती सोहळा होत आहे. हा सोहळा सबंध देशभर लोकोत्सव म्हणून साजरा करूया. प्रभू श्री. राम आणि माझे भावनिक नाते वेगळे आहे. माझा जन्म रामनवमीलाच झाला. दिल्लीतील अक्षरधामच्या धर्तीवर कागलमधील प्रभू श्री. राम मंदिर बांधू शकलो याचा मला आनंद आहे.
यावेळी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, धैर्यशील पाटील- कौलवकर, विठ्ठल चोपडे, जिल्हा युवक काँग्रेसचे नूतन अध्यक्ष नितीन दिंडे यांची मनोगते झाली.
स्वागत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी केले. आभार कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी मानले.
Ramesh Chavhan
Users Today : 33